कोल्हापूर – चालू गळीत हंगामात उसाचा दुसरा हप्ता तातडीने 200 रूपये द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली दत्त, गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद आदी साखर कारखान्यांवर निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, चालू गळीत हंगाम सुरू होऊन चार महिने होत आले. शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील ऊस संपत आलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या 20 व्या ऊस परिषदेमध्ये एफआरपी अधिक 200 रूपये अशी प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी केली होती. पहिल्यांदा विनाकपात एफआरपी तर उरलेले 200 रूपये जानेवारी महिना अखेर द्यायचे, अशी मागणी राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी केली होती. तालुक्यातील बहुतांश शेतकरी महापुराच्या कवेत सापडून उद्ध्वस्त झालेले आहेत. यामध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
राज्य सरकारने नुकसान भरपाई देताना ऊस उत्पादक शेतकर्यांना ठेंगा दाखवलेला आहे. सध्या बाजारपेठेत साखरेला भाव आहे. तसेच आगामी काळात देखील साखरेला चांगला दर आहे. शेतकर्यांची अर्थिक परिस्थिती पूर्णतः कोलमोडली आहे. खताचे दर दुप्पट झाले आहेत. डिझेलचे भाव वाढलेले आहेत. शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे.
त्यामुळे उसाचा दुसरा हप्ता 200 रूपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकर्यांना तातडीने देण्यात यावे, अन्यथा साखर कारखान्याविरूध्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल, असाही यावेळी इशारा देण्यात आला. यावेळी आण्णा चौगुले, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, रामचंद्र शिंदे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, विशाल चौगुले, राजाराम देसाई, सचिन शिंदे, आप्पा येडके, संपत पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.