* प्रकल्पाला विरोध नसल्याचे केले स्पष्ट
मांजरी (प्रतिनिधी) – पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जमिनीच्या मोबदल्यात चालू बाजारभावाच्या पाच पट मोबदला मिळावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या रेल्वेमार्गासाठी विरोध नसल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मांजरी बुद्रुक येथील जाई मंगल कार्यालयात या प्रकल्पातील बाधित शेतकरी एकत्र आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी भूमी संपादन रोहिणी आखाडे, प्रकल्पाचे जॉईंट जनरल मॅनेजर सुनील हवालदार, असिस्टंट मॅनेजर शेखर भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.
मांजरी बुद्रुक गावच्या हद्दीतून नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन केले जाणार आहे. त्याच बरोबर येथे एक-दोन गुंठे जमीन घेऊन घरे बांधलेल्या नागरिकांची घरेही या मार्गात बाधित होत आहेत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बरोबरच पाण्याचे बोअरवेल, विहिरी, फळबागा नष्ट होणार आहेत. त्यामुळे याचा योग्य मोबदला मिळावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले. मांजरी बुद्रुक येथून नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी फाटा असणार आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना चालू बाजारभावाच्या पाच पट मोबदला द्यावा.
याशिवाय नुकसान होणाऱ्या फळबागा, शेतातील पिके, विहिरी यांचे तसेच बाधित होणाऱ्या घरांचा अडीच पट मोबदला द्यावा. या सर्व मागण्या मान्य केल्यास या रेल्वे मार्गासाठी आमचा विरोध असणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी सांगितले.