नगर – राजकीय भूंकपानंतर महाविकास आघाडी पायउतार बंडखोर शिवसेना व भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये अमुलाग्र बदल झाला. या बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा व कार्यकर्त्यांचे पुन्हा मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले असून कार्यकर्ता संवाद मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यापासून त्यांनी या दौऱ्याला प्रारंभ केला असून येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशीला नगरमध्ये शरद पवार येणार असून त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
शरद पवार यांचे नगर जिल्ह्याकडे विशेष लक्ष असून त्या पार्श्वभूमिवर त्यांनी आपल्या दौऱ्याला नगर जिल्ह्यापासून सुरूवात केली आहे. विशेष भाजपने नगर जिल्ह्याची प्रभारी म्हणून जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकली आहे. ही जबाबदारी दिल्यापासून गेल्या तीन महिन्यात फडणवीस अद्यापही नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाही. मात्र त्यांच्या ज्या जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्याच जिल्ह्यापासून पवार यांनी आपला दौरा सुरू केला आहे. अर्थात फडणवीस येण्यापूर्वीच पवारांनी नगरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
भाजपने 18 महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीची आतापासून तयारी सुरू केली आहे. मिशन लोकसभा भाजपकडून सुरू झाल्याने त्या पार्श्वभूमिवर आता पवार यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न आहे. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना पवार उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादला जाताना ते नगरमध्ये थांबणार आहेत. रविवारी सकाळी साडे अकरा वाजता नगरच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.
फाळके म्हणाले, की सत्तांतरानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. राज्यात सत्ता येणे अशक्यप्राय असल्याच्या काळात पवार यांनी ती खेचून आणली होती. त्यामुळे आता सत्ता गेल्याचे वाईट वाटण्यात काही अर्थ नाही. असे असले तरी आता पुढील तयारी काय करायची, पक्षाची काय ध्येय धोरणे असतील, याबद्दल पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे.
‘ गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हेही या जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत. आतापर्यंतच्या राजकारणात पवार यांनी नगर जिल्ह्याला विशेष महत्व दिल्याचे आढळून येते. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातून भाजपच्या कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, कोण पालकमंत्री होणार याची चर्चा सुरूच आहे. यामध्ये पवार यांचे राजकीय विरोधक भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत आहे. शिवाय कर्जत-जामखेडमधील भाजपचे दुसरे नेते प्रा. राम शिंदे विधान परिषदेवर विजयी झाले आहेत. मंत्रिपदासोबतच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत आहे.