सम्राट गायकवाड
मुख्यमंत्र्यांसोबत बारामती मेडिकल कॉलेज व नीरा-देवघरच्या पाण्याबाबत चर्चासोशल मीडियावरही चर्चा
भेटीनंतर मुख्यमंत्री न्याय निर्णय घेतील, या अपेक्षेने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट तयार केली. तर पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळफास घेण्याचा इशारा दिला. फलटणकरांनी तयार केलेली पोस्ट भावनिक आहे. त्यामध्ये म्हटले की, बारामतीचे साहेब. पुणे जिल्ह्यापेक्षा सातारा आणि सोलापूर जिल्ह्याने तुमच्यावर अधिक प्रेम केले. मात्र, राजकीय ताकद वापरून त्यांचे पाणी तुम्ही बारामती आणि इंदापूरसाठी वापरले. आता आम्ही हक्काची लढाई लढतोय. तेव्हा तुमच्यावर प्रेम केलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळू द्या, असे भावनिक आवाहन सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पवारांना केले आहे.
सातारा – जो सातारा जिल्हा कायम पाठीशी राहिला, भरभरून प्रेम दिले. त्या सातारा जिल्ह्याच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ा बारामतीच अधिक प्रिय असल्याचे दाखवून दिले. साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजसाठी कधीही ब्र शब्द न काढणाऱ्या पवारांनी शुक्रवारी बारामती मेडिकल कॉलेजसाठी आणि त्याचबरोबर नीरा- देवघरच्या पाण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
पवार यांनी बारामतीबद्दल दाखविलेल्या प्रेम पाहता सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील तत्कालिन कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारने सात वर्षापूर्वी राज्यात पाच ठिकाणी मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली होती. त्यामध्ये साताऱ्यासह बारामतीचा समावेश होता. बारामती कॉलेजची इमारत बांधून जवळपास पूर्ण झाली आहे. तर साताऱ्याच्या कॉलेजसाठी सातारा- कोरेगाव रस्त्यावरील खावली येथे जागा मंजूर करण्यात आली होती. मात्र, तत्कालिन पालकमंत्री व विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांनी अंतराचे कारण पुढे करत कृष्णा खोरे महामंडळाच्या जागेचा प्रस्ताव पुढे केला.
परंतु साताऱ्याच्या कॉलेजबाबत कोणताच निर्णय झाला नाही. त्याचे स्पष्टीकरण येत्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालिन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्ह्यातील जनतेला द्यावे लागणार आहे. दीड वर्षापूर्वी खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागेचा प्रश्न निकाली लावला. कृष्णा खोरे महामंडळाची 25 एकर जमीन मेडीकल कॉलेजसाठी देण्याचा निर्णय झाला. पुढे पदनिर्मिती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवून गेले. मात्र, पुढे काही गती मिळालेली नाही.
सर्व घटनाक्रम पाहता बारामतीच्या तुलनेत सातारा मेडीकल कॉलेजची उपेक्षा अद्याप सुरूच आहे. उदयनराजे वगळता राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने साताऱ्यात मेडिकल कॉलेज व्हावे, त्यासाठी आत्मियतेने प्रयत्न केले नाहीत. थेट पंतप्रधानांना बारामतीत आणणारे शरद पवार यांनीदेखील मागील पाच वर्षात साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजसाठी ब्र शब्द काढला नाही. अशी साताऱ्याची बाजू असताना पवार शुक्रवारी बारामती मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्र्यांना भेटले.
बारामतीचे सुपुत्र म्हणून त्यांनी भेट घेणे स्वाभाविक आहे. मात्र, 2009 ची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवताना त्यांनी कोरेगाव तालुक्यातील नांदवळ आपले गाव असल्याचा दाखला दिला होता. त्यामुळे पवार बारामती एवढेच साताऱ्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना भेटताना सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमदारांना निमंत्रित करून बारामतीसह साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजच्या प्रलंबित कामाची चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे झालेले दिसत नाही. यातून सातारा जिल्ह्यातील विशेषत: राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी बोध घेऊन स्वतःच्या बळावर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि त्याचबरोबर माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील गावांसाठी नीरा- देवघर धरणातील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. असे असताना अनेक वर्षापासून ते पाणी बारामती आणि इंदापूर नेण्यात येत होते. त्याबाबत माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर, ऍड. बाळासाहेब बागवान यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा लढा उभारण्यात आला. परंतु राजकीय अपरिहार्यतेअभावी न्याय मिळू शकला नाही.
अखेर माढा लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला आणि नूतन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गिरीश महाजन यांच्याकडे नीरा- देवघरचे हक्काचे पाणी देण्याची मागणी केली. महाजन यांनी निंबाळकर यांची मागणी मंजूर केली. परंतु पवारांना त्यामध्ये राजकारण दिसले. त्यामुळेच त्यांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने नीरा-देवघरच्या पाण्याचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांपुढे मांडला.