मुंबई – राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा वारंवार वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे शिवसेनेने यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरीकडे, संजय राठोड यांनीही या विषयावर मौन बाळगले असून त्यांचे नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे’ असं वक्तव्य करत एका प्रकारे संजय राठोड यांची पाठराखण केली.
दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप निलेश राणे यांनी पवार व शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. याबाबत ट्विट करत आपली भूमिका मांडताना त्यांनी, “अजित पवारांना शिवसेनेच्या मंत्र्याच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार काय? उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यायचा ठरवला तरी ते अजित पवारांना विचारणार आहे का किंवा ते स्वतः शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतात का? पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्त्व वाढवून घ्यायची सवय.” अशी टीका केली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राठोड यांची बाजू मांडताना, “आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती तर खऱी आहे. मागेदेखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशाच पद्दतीचे आरोप झाले. माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे,” असं वक्तव्य केलं होत.