या मुद्द्यावर यांनी निवडणुका लढवल्या : अजित पवार
पुणे – पवना बंद पाइपलाइन प्रकरणात सुरुवातीपासून राजकारण केले गेले. अजित पवारांनी गोळीबार करायला लावला, असे पसरवून या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या. परंतु, आता राजकारण न आणता काही विकासकामे करायची असतील, तर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच सर्वपक्षीय आमदारांना पाइपलाइनच्या कामाची स्थगिती उठवण्यासंदर्भात लेखी मागणी करणारे पत्र देण्यास सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात पवना बंद पाइपलाइन व लोकांच्या पुनर्वसन विषया संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके व इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पवना बंद पाइपलाइनच्या कामाची स्थगिती उठवण्यासाठी सर्व संबंधित आमदारांनी लेखी मागणी करा. यासाठी पवार यांनी बैठकीत स्वत: फोन करून आमदारांना पत्र देण्यास सांगितले.
तसेच यामुळे बाधित होणाऱ्या लोकांना प्रत्येकी किमान दोन एकर जमीन देणे, धरणाच्या मजबुतीकरण व उंची वाढविण्याचे काम हाती घेणे, उंची वाढल्यानंतर साठणारे अतिरिक्त पाणी साठा एक टीएमसी पिंपरी-चिंचवड महापालिकेला व अर्धा टीएमसी पाणी संबंधित गावांना देण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.