श्रीनिवास पाटील यांचा उदयनराजेंना टोला
कराड – मतदारांच्या बोटावरची शाई अजून गेलेली नाही, तोपर्यंतच उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता या जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक लागली आहे. शरद पवारांनी त्यांच्यावर प्रेम केले, त्यांची वेळोवेळी पाठराखण केली, सांभाळले. तेच लोक आज त्यांना सोडून गेले. मात्र, शरद पवार यांना दणका द्यायचाही माहित आहे, अन् लोकांना दणकून निवडून आणायचे हेही माहित आहे, असा टोला सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लिबर्टी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, अविनाश मोहिते, सुनील माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, नगरसेवक सौरभ पाटील, डॉ. अशोकराव गुजर, अजित पाटील चिखलीकर उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील म्हणाले, जनतेच्या भल्यासाठी काम करणारा नेता म्हणजे शरद पवार आहेत. ते आमचा आरसा असून आपल्या सगळ्यांचा चेहरा त्यांच्या डोळ्यात दिसतो. एवढी लोकांबद्दल त्यांच्यात आपुलकी आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसह लोकसभेच्या पोटनिवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात परिवर्तन अटळ असून आघाडीचा विजय निश्चित असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला आश्चर्य वाटते, अचानक लोकसभेची जागा रिक्त कशी झाली. लोकांच्या मतांशी हे सरकार खेळत आहे.
सध्या लोकांमध्ये तीव्र संताप असून लोकांना वेठीस धरले जात आहे. मात्र बाळासाहेब पाटलांना कोणी हात लावू शकलेले नाही. कराड हे महाराष्ट्राच्या विचारांचे केंद्र आहे. ज्या सरकारला बहुजन राज्य संपवायचे आहे, असे सरकार पुन्हा न यावे. यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सध्या आर्थिक मंदी सुरू आहे. उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीवेळी अर्ज भरताना त्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल असल्याची माहिती दिलेली नाही. अशा गंभीर गुन्ह्याबाबत पंतप्रधान का कारवाई करत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान शरद पवार साहेबांनी राज्यावर जर काही उपकार केले असतील तर, त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी जनतेला मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आज देशावर पाच वर्षांपूर्वी भाजप रूपात संकट आले. यानंतर आपल्याला काय मिळालं? आज प्रचंड प्रमाणात घोषणा होत आहेत, मात्र सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम कुठेही होत नाही. मंदिर, देशावरील हल्ल्याचा प्रश्न काढायचा आणि राजकारण करायचं हे काम सध्या सरकारकडून केले जात आहे. शरद पवार 79 व्या वर्षी युवकांच्या माध्यमातून विचार करण्यास पुढे आले आहे, मात्र भाजपने त्यांच्यामागे चौकशी लावून गुन्हा दाखल केला. अशा प्रवृत्तीपासून आपण सावध राहिले पाहिजे. यावेळी सुनील माने, अजित पाटील-चिखलीकर, देवराज पाटील, प्रशांत यादव, लालासाहेब पवार, मानसिंगराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देवराज पाटील यांनी केले. आभार प्रशांत यादव यांनी मानले.