मुंबई: दोन वर्षांपूर्वी एक स्थिती अशी आली होती की, राष्ट्रवादी आणि भाजप सोबत येणार होते. विशेषतः शरद पवारांनी भाजपाला ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वेबसाईट’ला यावर प्रतिक्रया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की, शरद पवारांनी भाजपाला ऑफर दिली होती. पण खरं काय? या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले, “असं आहे की देवेंद्र फडणवीस सध्या अस्वस्थ आहेत. बेचैन आहेत. त्यांना सुरूवातीला स्वप्न पडत होती सरकारमध्ये येण्याची, पण त्यांचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे अशा प्रकारचं स्टेटमेंट करून जुन्या गोष्टी काढत राहतात.”
“करोनाच्या काळात आमचं सरकार व्यवस्थित काम करत आहे. आमचं पोलीस खातं आहे, आमचे डॉक्टर्स आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या गोष्टी काढून वातावरण खराब करण्यापेक्षा अशा करोनाच्या स्थितीमध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केल पाहिजे,”असे गृहमंत्री म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची सुरूवातीपासूनची युती होती. आम्ही निवडणुका ही त्याच पद्धतीनं लढल्या. त्यानंतर शिवसेना आमच्याबरोबर आली. तिन्ही पक्षांचं चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात सरकार सुरू असल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्ये ते करत असतात, असा टोला देखील देशमुख यांनी फडणवीसांना लगावला.