किरण जगताप
मतदारसंघातील गावपुढाऱ्यांना सारले बाजूला : सर्वसामान्य जनता आली केंद्रस्थानी
कर्जत – मोजक्याच गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा कर्जत तालुक्यातील राजकारणाचा फंडा राहिलेला आहे. कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची दिशा, कार्यक्रम न देता त्यांचा वापर करून घेण्याची नेत्यांची राजनीती येथे रूढ होती. मात्र कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये रोहित पवार यांनी एंट्री करून सामान्य कार्यकर्त्यांना वळ दिले जात असून, त्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पवार यांचा राजकीय हेतू बाजूला ठेवला तरी फक्त मोजक्याच पुढाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करण्याची त्यांची पद्धती नाही हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही खा. डॉ. सुजय विखे यांनी याच प्रकारे जनतेशी जवळीक साधली होती.
कर्जतकरांसाठी ही बदलती राजकीय कार्यपद्धती असून त्याला प्रतिसाद मिळत आहे. कर्जत तालुक्यातील राजकीय कार्यपद्धतीचा इतिहास पाहिला तर मूठभर लोकांनी गाव पुढारी हाताशी धरून राजकीय पोळी भाजण्याची पारंपरिक पद्धती होती. फक्त निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना उत्तेजित करून त्यांचा वापर करून घेण्याकडे नेत्यांचा कल होता. राजकीय विरोधकांबाबत काहीतरी विष पेरून त्याचा कार्यकर्त्यांमार्फत प्रचार घडवून आणणे, कौटुंबिक प्रश्न वाढवून ते मिटवण्याचे श्रेय घेणे, बड्या नेत्यांच्या सभेत, कार्यक्रमात किरकोळ पुढारपण देणे, असे कितीतरी फंडे तालुक्यात रुजलेले होते. मात्र सध्या रोहित पवार हे तालुक्यातील नेते तसेच गावपुढाऱ्यांना विशेष महत्त्व न देता सामान्य कार्यकर्ते, महिला, कामगार आदींच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत.
समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नोकरी मार्गदर्शन मेळावा, विविध शिबिरे, महिलांसाठी उपक्रम, कार्यशाळा अशा अनेक माध्यमातून त्यांनी लोकांना दिशा देण्याचे काम सुरू ठेवले आहे. भावनिक मुद्यांना हात न घालता विकासावर केंद्रित राजकारण करण्याचे सूचित करून मतदारसंघाला वेगळी दिशा दिली आहे. बार्गेनिंगमध्ये पटाईत असलेल्या नेत्यांना ही कार्यपद्धती रुजताना दिसत नाही. त्यामुळे अनेकांकडून ‘वेगळा विचार करूचे फंडे वापरले जात आहेत.
निवडणूक आली की आपल्यामागे असलेले कार्यकर्ते व मतदार यांची संख्या दाखवून त्याची आर्थिक गणिते मांडून उमेदवाराबरोबर तोडपाण्याला बसण्याची गावपुढाऱ्यांची पद्धती आता पवारांच्या राजकारणामुळे मोडीत निघत आहे. यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनीही अशाच पद्धतीने सामान्य जनतेपर्यंत पोहोचत विजय खेचून आणला आहे. राजकारणाच्या या कार्यपद्धतीमुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत असून, ती जमेची बाजू आहे. विखे आणि पवार यांचा तालुक्यात प्रत्यक्ष झालेला राजकीय प्रवेश येथील राजकारणाला दिशा देणारा ठरत आहे.