नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव दौऱ्यावर असलेले पवार मुंबईला परतले असून त्यांनी राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची तातडीची बैठक उद्या बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे उपस्थित राहतील.
जळगावमध्ये पत्रकारांसोबत बोलत असतांना पवार म्हणाले, भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे वेगवेगळे विषय आहेत. केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे देणे, म्हणजे त्यांना काही गोष्टी झाकायच्या किंवा लपवायच्या आहेत. सत्य बाहेर येण्याची भीती इथल्या तत्कालीन सरकारला असावी, म्हणून दिल्लीच्या सरकारने मदतीला येत सर्व प्रकरण काढून घेतलं. हे योग्य नाही.