ख्यातनाम लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर यांनी 1955 साली म्हणजे तब्बल 65 वर्षांपूर्वी “पवनाकाठचा धोंडी’ रेखाटला आणि आजही मराठी मनावरचं धोंडीचं अधिराज्य संपलेलं नाही. 172 पानांच्या या कादंबरीतील सारीच पात्रं वाचकांच्या स्मरणात राहतात पण खऱ्या अर्थाने विचारांच्या प्रांगणात दीर्घकाळ रेंगाळतो तो धोंडीच!
पुण्याजवळच्या मावळप्रांतात सह्याद्रीतल्या डोंगरदऱ्यांचा माग काढत पवना नदी वाहते. त्या भागातली ती जीवनदायिनी, म्हणून लोक तिला “पवनामाय’ म्हणतात. या डोंगरांच्या रांगेत अनेक गडकिल्ले आपल्या मस्तीत आजही ताठ मानेने उभे आहेत, त्यातला एक गड म्हणजे तुंगी. तुंग म्हणजे उंच! या तुंगी गडाचा हवालदार धोंडी धमाले! शिवाजी महाराजांच्या काळी तुंगीवरच्या आक्रमणात गडावरचा किल्लेदार पळून गेला पण हवालदार मात्र शर्थीने लढला, तेव्हा राजाने गड हवालदाराच्या ताब्यात दिला. तेव्हापासून तुंगीगड ढमाले घराण्याकडेच राहिला.
पुढे कालमानानुसार किल्ला ओस पडला. वस्ती गडाखाली आली. पवनाकाठचा दहा एकराचा सलग तुकडा हवालदाराला मिळाला होता. वंशपरंपरेने धोंडी तो तुकडा प्राणपणाने कसू लागला. धोंडीची काळ्या आईवर कमालीची भक्ती. आपल्या या काळ्याशार तुकड्यात कुठे काडीकचरा राहू नये म्हणून धोंडी कमालीचा खपत असे. मुळात तो अत्यंत खप्या, श्रद्धावान, निर्मळ अंत:करणाचा, भक्ती करणारा असा होता. सकाळी उठायचं आणि श्रद्धापूर्वक शेताकडे निघायचं. दिवसभर वेगवेगळी कामं करायची आणि संध्याकाळी घरी येऊन भाकरतुकडा खाल्ला की निवांत झोपायचं. आजूबाजूची सारी खेडी धोंडी हवालदाराला कमालीची मानायची. कुठलाही तंटाबखेडा धोंडीच्या मध्यस्थीने चुटकीसरशी सुटायचा. दुसऱ्याच्या घरचं दु:ख, धोंडीचं दु:ख, दुसऱ्याच्या घरचा आनंद तो धोंडीचा आनंद एवढा आपपरभावाच्या पलीकडे पोहोचलेला धोंडी म्हणूनच सर्वांसाठी आधारस्तंभ बनून राहिला होता.
तुंगीगड तसा जगाच्या आठवणीतून दूर गेलेला, तेव्हा हवालदार तरी बाहेरच्या जगाला कुणाला ठाऊक असणार पण धोंडीला आपल्या हवालदारकीचा कोण अभिमान! गडावरच्या महादेवाच्या मंदिरात दिवाबत्ती करणं त्याचं कर्तव्य झालं होतं. पीक खळ्यात पडलं की बलुतेदाराच्या घरी जाऊन त्यांना बलुतं देणारा धोंडी थेट लेणावळ्यापर्यंत पोहोचायचा. आपण सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे, वाईट झेललं पाहिजे आणि चांगलं यांच्यासाठी ठेवलं पाहिजे ही विचारसरणी असणाऱ्या धोंडीला एक लहान भाऊ होता. त्याचं नाव कोंडी. धोंडीपेक्षा कोंडी तब्बल वीस वर्षांनी लहान. कोंडी झाला आणि वर्षातच आई गेली. मग त्याची सारी उस्तवार धोंडी आणि त्याची पत्नी सारजा यांनी पाहिली. धोंडीला दुर्दैवाने मूल झालेच नाही त्यामुळे कोंडी हाच धोंडीचा मुलगा झाला. कोंडीच्या कोडकौतुकामुळे कोंडी लाडावला. धोंडी आणि सारजाने कष्ट उपसावेत आणि कोंडीने फक्त मौजमजा करावी, हा शिरस्ता होऊन बसला. कोंडीला पहिलवानकीमध्ये रस होता. दररोज तालमीमध्ये व्यायाम करायला तो जाई. धोंडी कोंडीला कौतुकाने कोंडीबा हवालदार म्हणत असे.
गावातल्या गावदेवाचं नाव वाघोबा. या वाघोबाच्या देवळासमोर पोळ्याचे सजवलेले बैल लोक मिरवित.
एकदा या मिरवणुकीच्या वेळी कोंडीच्या बैलाला बांधलेला नारळ गावातल्या किशा न्हाव्याने हस्तगत केला आणि कोंडीच्या मनात त्याच्याविषयी वैरभावना निर्माण झाली. किशा आणि कोंडीमध्ये धराधरी झाली आणि तेथून निर्माण झाली एकमेकांमध्ये स्पर्धा. यात्रेच्या दिवशी दोघांमध्ये कुस्ती करायची आणि त्यात जिंकणारा श्रेष्ठ अशी ती स्पर्धा होती. यात्रेचा दिवस उगवला. साऱ्या गावाला एकच प्रश्न पडला, कुस्ती कोण जिंकणार, कोंडी की किशा? अनपेक्षितपणे कुस्ती किशाने जिंकली आणि त्याला आपल्या गावचा पोरगा म्हणून धोंडीने खांद्यावर उचलून घेतले. ही गोष्ट कोंडीला मोठी अपमानास्पद वाटली. कोंडी घरी येऊन वहिनीजवळ आपली खदखद काढतो. आपल्या भावावर रुसलेला कोंडी दुसऱ्या दिवशी घरात थांबत नाही. दिवस मावळतीला लागला तरी तो घरी येत नाही. मग सुरू होते धोंडी आणि सारजाच्या काळजात कालवाकालव. सगळं गाव कोंडीला शोधायला निघतं पण कोंडी काही सापडत नाही.
धोंडी-सारजा हताश होतात. घरी येऊन बसतात. साऱ्या घरावर अंधार पडतो आणि त्या अंधारात कोंडी दबक्या पावलाने आत शिरतो. कोंडीच्या डोक्यातला कली थंडावलेला असतो, पण एक दुसरीच दुर्बुद्धी त्याच्या डोक्यात त्याचा मित्र भिमा घालतो. गावातले काही तरुण रोजच्या रोज दूध घालण्यासाठी लोणावळ्याला जात असतात. लोणावळ्याचे वर्णन भिम्याच्या तोंडून ऐकल्यावर कोंडीला त्याचे आकर्षण वाटू लागतं. एक दिवस भिम्या त्याला लोणावळ्याला घेऊन जातो. तेथील हॉटेलमध्ये चमचमीत खाऊ घालतो. लोणावळ्याच्या वातावरणाचं आकर्षण कोंडीच्या मनात निर्माण करतो आणि कोंडीला म्हशी घेण्याची घाई होते. पण धोंडीच्या रक्तात भिणलेली हवालदारी त्याला हा दूध-पाण्याचा धंदा करण्याचा सक्त विरोध करते. म्हशी घ्यायच्या, त्याची देखभाल, मग दुधाच्या कावडी घेऊन लोकलने लोणावळ्याला जायचे, दारोदार दूध विकायचे हे मानी स्वभावाच्या धोंडीला कसे पटणार? त्यापेक्षा आपल्या काळ्या आईची जेवढी सेवा आपण करू तेवढी ती आपल्या पोटाला अधिकाधिक देईल ही त्याची श्रद्धा!
असे असले तरी कोंडी हे ऐकण्याच्या पलीकडे गेलेला असल्याने सारजाच्या आग्रहाने व्याजाने पैसे काढून धोंडी कोंडीला म्हशी घेऊन देतो. आता सारजाच्या पाठीमागे म्हशींची उस्तवार करण्याचे नवीन काम लागते. भिम्या आणि बाकीच्या मुलांसोबत कोंडी लोणावळ्याला जाऊ लागतो. तेथे एक दिवस म्युन्सिपालिटीमध्ये पट्टेवाल्याचं काम करणाऱ्या घारेदादांकडे दूध देणाचा प्रसंग येतो. घारेंची मुलगी लग्नाची असते. धोंडी हवालदाराचा हा भाऊ आहे, एवढे घारेला पुरेसे असते. एक दिवस धोंडीकडे घारेदादा येतो आणि आपल्या मुलीला सरस्वतीला कोंडीसाठी पदरात घ्या अशी विनवणी करतो. एव्हाना कोंडीचे लोणवळ्याला जाणे त्याच्या आयुष्याला वेगळे वळण देऊ करते. तो सिगारेट ओढू लागतो, कोल्हाटणीच्या तमाशाला जातो, हॉटेलच्या पदार्थांशिवाय दुसरे काही त्याला गोड लागत नाही. धोंडीची तडफड होते पण पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेल्या कोंडीला तो बोलू शकत नाही.
घारेदादांच्या आग्रहावरून धोंडी घारेदादांच्या घरी येतो आणि सरस्वतीचे आदबशीर वागणे पाहून मनोमन हरकतो. सरस्वती त्याला पसंत पडते. कोंडीवर अक्षदा पडतात. काही दिवस सुखाने जातात. धोंडीला सुनबाईंचे कमालीचे कौतुक असते. सुनबाईत त्याला त्याच्या आजीचा भास होतो. अशातच एकदिवस धोंडीवर आभाळ कोसळतं. अकस्मात सारजा धोंडीला सोडून अनंतात विलीन होते. धोंडी मोडून पडतो. कोंडीला दुधाच्या धंद्यातून मिळालेल्या पैशाला धोंडी हातही लावत नाही. वातावरणात असा तणाव असतानाच गावात रोगराई येते आणि सारी दुभती जनावरं पटापट माना टाकतात. त्यात कोंडीच्या म्हशीही असतात. आता पुन्हा म्हशी घेण्यासाठी पुरेसा पैसा नसतो. मग कोंडी आपल्या डोंगराएवढ्या भावाकडे जमिनीचा तुकडा नावावर करून मागतो. धोंडीसाठी हा मोठा धक्का असतो. त्याच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो. भिम्याच्या नादी लागलेला कोंडी एक दिवस रात्रीच्या अंधारात धोंडीवर हल्ला करतो. रक्तबंबाळ झालेला धोंडी घरी पोहचतो त्यावेळी सरूला प्रचंड धक्का बसतो. “वाटेत लागलं’ असं तो खोटंच बोलतो पण खरी हकीगत कळल्यावर मात्र सरस्वती धाय मोकलून रडू लागते या घटनेनंतर आधी नाही म्हणणारा धोंडी सारी जमीन कोंडीच्या नावावर करून देतो. मी गडाचा आणि काळ्या आईचा सेवक आहे ही त्याची भूमिका त्याला कधीच सोडून जात नाही.
कोंडीला म्हशी आणण्यासाठी धोंडी स्वत: गहाण राहतो आणि कर्ज काढून आणतो. आता धोंडीला जगण्यातला राम संपल्याचे जाणवू लागतं. तो काम एके काम करत राहतो. हा थोर मनाचा माणूस कुठेतरी तुटला आहे हे सरूच्या ध्यानात येतं. ती आपल्या वडिलांच्या जागी असणाऱ्या धोंडीला जपू पाहते. पण संकटं येतच राहतात, गावात दुष्काळ पडतो. बैलजोडीतील एक बैल मरतो. नांगरणीला बैलजोडी नसते. मानी स्वभावाच्या धोंडीला दुसऱ्याचे बैल नको असतात आणि सगळ्या गावाने मिळून नांगरणी करून देण्याची पद्धतही नको असते. पण कोंडी आणि सरू ऐकत नाही. इर्जिक करायचं ठरवतात, हे धोंडीच्या कानावर जातं आणि दुसऱ्या दिवशी पहाटेसंच तो एका बैलाला घेऊन शेतात जातो. सरू न्याहरी घेऊन शेतात जाते, तेव्हा तिला एक धक्कादायक दृष्य शेतात दिसतं. औताच्या एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला धोंडीने स्वत:ला जुंपून घेतलेले असते. धोंडी हवालदार इंचाइंचाने शेती नांगरत असतो. कादंबरीचा हा शेवट वाचकाच्या मनात घर करून बसतो. काबाडकष्ट करणारा, सभोवतीच्या माणसांसाठीच जगणारा राजा मनाचा माणूस धोंडी आपल्या अवतीभोवती अनेकदा आढळतो. त्याचं मन जपणं हे आपलं कर्तव्य आहे, हेच गोनिदा या कादंबरीचा नायक धोंडीला रेखाटून साऱ्यांना सांगतात, यात शंका नाही.
डॉ. विनोद गोरवाडकर