सतर्कतेचा इशारा : 12 हजार 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण हे तिसऱ्यांदा “ओव्हर फ्लो’ झाले आहे. धरणातून 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 106 मिलिमीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला असून पवना धरण यावर्षी तिसऱ्यांदा शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले असून 12 हजार 600 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. गेल्यावर्षी 3179 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. तर यावर्षी 3337 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.
यामुळे पवना धरणाचे सहा दरवाजे उघडून त्यातून सकाळी 6 हजार क्यूसेक तर दुपारी अकरा नंतर 12 हजार 600 क्युसेक पाणी सोडण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कोसळलेल्या तुफान पावसाने पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा नदीच्या लगतच्या भागात पाणी शिरले होते. सुमारे 7 हजार नागरिक पूरस्थितीने बाधित झाले होते. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला अर्लट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्षणाक्षणाला पाटबंधारे विभाग, धरण अधिकारी यांच्याशी संपर्क ठेऊन नागरिकांना सूचना देत रहा, असाही आदेश आयुक्तांनी दिला आहे.
सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवडमधील पुरबाधित भागातील नागरिकांसह पवना धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. विजेवरील मोटारी, इंजिन, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवितहानी वा वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी केले आहे.
पाणी पुरवठ्याचा विस्कळीतपणा कायम
पाणी प्रश्नावरून महासभेत गदारोळ झाला. त्यानंतर झालेल्या विशेष सभेतही गोंधळ झाला तरी पाणीपुरवठ्यातील नियोजनाचा अभाव अद्याप कायम आहे. ऐन गणेशोत्सवात शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बहुसंख्य भागात कमी वेळ व अल्प दाबाने पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान, यंदा 4 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा पवना धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा तर आज तिसऱ्यांदा धरण शंभर टक्के भरले आहे. धरणात मुबलक पाणी साठा असताना पाणी कुठे मुरतेय, असा सवाल नागरिक करीत आहेत.