साठा 8 टक्क्याने कमी ः वाढत्या बाष्पीभवनामुळे होतेय घट
धरणातूनच पाणी उचलल्याचा परिणाम
पवना धरण यंदा ऑगस्ट महिन्यात 100 टक्के भरले होते. परंतु, त्यानंतर पावसाने ओढ दिली. परतीच्या पावसाने देखील दडी मारली. परिणामी, नदीपात्राऐवजी पावसाळ्यातच धरणातून पाणी उपसा करावा लागला. त्यामुळे धरणातील साठा यंदा लवकर कमी होत गेला. यंदा गतवर्षीपेक्षा धरणात तब्बल 8 टक्के पाणीसाठा कमी आहे. “स्कायमेटने’ सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आणि मान्सून येण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी – कडक उन्हाच्या बाष्पीभवन, पाण्याची वाढती मागणी यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे. गेल्या दहा दिवसांत धरणातील चार टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. आजमितीला धरणात 32.93 टक्के पाणीसाठा असून 10 जूनपर्यंत पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. धरणात आजमितीला 32.93 टक्के पाणीसाठा असून हा साठा गतवर्षीपेक्षा 8 टक्के कमी आहे. हा पाणी साठा 10 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 40.09 टक्के पाणीसाठा होता.
पिंपरी-चिंचवड महापालिका कोट्यापेक्षा अधिक पाणी उपसा करत होती. महापालिकेला एका दिवसाला 440 एमएलडीच पाणी उपसा करण्याची मर्यादा दिली होती. परंतु, शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने महापालिकेकडून 500 एमएलडी पाण्याचा उपसा केला जात होता. त्यामुळे धरणातील साठा कमी होत असल्याने 4 ऑक्टोबर 2018 रोजी कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत महापालिकेला 10 टक्के पाणीकपात करण्याचे सक्त निर्देश दिले होते. परंतु, महापालिकेने पाणीकपात करण्यास विलंब केला. परिणामी, धरणातील साठा कमी
होत गेला. पिंपरी महापालिकेने 1 मार्च 2019 पासून पाणी कपात सुरु केली आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. तरी देखील धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. कडक उन्हाचा मे महिना अद्याप जायचा आहे. त्यामुळे साठा आणखी घटण्याची भीती आहे.