नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील भवानीपूर आणि अन्य दोन विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार तेथे 30 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 3 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी त्यांना कोणत्या तरी एका मतदार संघातील पोटनिवडणुकीला निवडून येणे बंधकारक आहे. त्यामुळे त्यासाठीचा त्यांचा आता मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मधील समशेरगंज आणि जांगीपूर येथील पोटनिवडणुकाही घोषित केल्या असून त्या खेरीज ओडिशातील पिपली या मतदार संघातहीं निवडणूक होणार आहे. मात्र अन्य राज्यांतील 31 मतदार संघांच्या पोटनिवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आहेत.
कोविड मुळे तेथील निवडणुका नंतरच्या टप्प्यात होतील असे निवडणूक आयोगाने सपष्ट केले आहे. पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतील घटनात्मक अडचण लक्षात घेऊन तसेच त्या राज्याने केलेल्या विशेष विनंतीचा मान राखून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांना निसटत्या फरकाने सुवेंदु अधिकारी यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी सहा महिन्याच्या आत कोणत्या तरी पोटनिवडणुकीत विजयी होणे आवश्यक ठरले होते.