-माधव विद्वांस
मराठी साहित्यामध्ये ज्यांच्या साहित्यावर पीएच.डी. केली जाते, असे तमाशाक्षेत्रातील भूषण “पठ्ठे बापूराव’ यांचा आज स्मृतिदिन. पठ्ठे बापूराव यांचे मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी (जन्म : 11 नोव्हेंबर 1866). त्यांचा जन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सांगली) ह्या गावी झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत झाले होते. तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला.
ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकून त्यांनी त्यात थोडे बदल केले. ही गाणीसुद्धा लोकप्रिय होऊ लागली. ही गाणी “श्रीधरची गाणी’ या नावाने ओळखली जाऊ लागली. श्रीधरच्या शिक्षकांनी त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे वयाच्या 16व्या वर्षी श्रीधरला राणीसाहेबांनी बडोद्यास नेले. तेथे ते संस्कृत भाषा शिकले. त्याबरोबरच त्यांनी कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली. दुर्दैवाने श्रीधर अवघ्या सतरा वर्षे वयाचे असताना त्यांचे आई-वडील निवर्तले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून ते परत गावी आले.
गावाकडे घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. त्यांच्या कानावर तेथील कार्यक्रमाचे सूर पडत असत. पण कुलकर्णीपदामुळे तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना समाजाचे भीतीने होत नव्हते. अखेर त्या लावणीच्या सुरांनी त्यांना तमाशाकडे खेचलेच. चोरून ते तेथे हजेरी लावू लागले. तेथे त्यातील कलावंतांच्या ओळखी झाल्या व ते त्यांना लावण्या लिहून देऊ लागले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. अखेर त्यांनी घर सोडले व कलेला वाहून घ्यायचे ठरविले.
पठ्ठे बापूराव मुंबईला आले आणि बटाट्याच्या चाळीत राहू लागले. मुंबईमध्ये ते सुरुवातीस तमाशाच्या फडात जाऊन लावण्या करून देत असत. हे काम त्यांनी काही दिवस केले. याच वेळी त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील “पवळा’ नावाची कलावंतीण भेटली. त्याकाळी तिला चाहते “मस्तानी’ची उपमा देत असत. तिचा आवाजही गोड होता. बापूरावांची काव्य प्रतिभा लावणीतून बहरू लागली. बापूरावांची लावणी पवळाचे लावण्य व गायन, त्याला नृत्याचा साज यामुळे या जोडीची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली. तमाशामध्ये चांगली प्रसिद्धी मिळाल्यावर त्यांनी
स्वतःचा फड काढला.
मुंबईच्या एल्फिन्स्टन थिएटरवर “पवळा व पठ्ठे बापूराव’ यांना पाहण्यासाठी तिकीट लावण्यात आल्याचा उल्लेख तमाशा इतिहासामध्ये सांगितला जातो. त्याकाळी दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. त्यांच्या लावण्या मरणोत्तर वर्ष 1958 मध्ये तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत. काही कारणाने पवळा व त्यांच्यात मतभेद झाले व पवळा त्यांना सोडून गेली. त्यामुळे ते खचून गेले. शेवटी शेवटी तर ते खूपच विपन्न अवस्थेमध्ये होते. त्यांच्याच फडात काम करणाऱ्या “ताई परिंचेकर’ यांनी त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. या श्रेष्ठ कवीचे 22 डिसेंबर 1945 रोजी निधन झाले.