नवी दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारने नर्सरी ते बारावी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती अभ्यासक्रम हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरूवात मंगळवारपासून झाली आहे. विद्यार्थ्यांना चांगले नागरीक घडवण्यासाठी हा एक नाविन्यपुर्ण उपक्रम आहे.
दोन वर्षांपुर्वी केजरीवालांनी अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम काही नामवंत शिक्षण तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने निश्चीत करण्यात आला आहे. यात देशभक्ती ध्यान ते देशभक्ती डायरी पर्यंतचे अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम आहेत. या अभ्यासक्रमासाठी कोणतेही पाठ्यपुस्तक नाही. विविध प्रयोग आणि उपक्रमांमधून विद्यार्थीै यात घडवले जाणार आहेत.
यात सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी रोज शाळेत हा 40 मिनीटांचा देशभक्ती तास घेतला जाणार असून 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून दोनदा हा क्लास घेतला जाणार आहे. प्रत्येक तास हा देशभक्ती ध्यानाने सुरू होणार आहे. त्यात विद्यार्थ्याला सुरूवातीला मी माझ्या देशापुढे झुकतो आणि भारत मातेचा सन्मान करतो अशी प्रतिज्ञा घ्यायची आहे.
खरा देशभक्त कोणाला म्हणावे याचेहीं धडे यात दिले जाणार असून विद्यार्थ्यांच्या कल्पनेलाही यात वाव दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना देशभक्तीची डायरीही लिहीण्याच्या उपक्रमाचा यात समावेश आहे. यात विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना मांडण्याबरोबरच देशासाठी आपण आज दिवसभरात काय केले याचीही माहिती नोंदवण्यास सांगण्यात येणार आहे.
नागरीक म्हणून आपली देशाप्रती असलेली जबाबदारी शिकवण्याबरोबरच विधायक स्वरूपाची टीका कशी करावी याचेही धडे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. कर्तव्य दक्षपणे नागरीक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याबरोबरच देशाच्या विकासातील योगदान, प्रामाणिकपणाच्या मुल्याची जपणूक, विकासाच्या नवनवीन संकल्पना या विषयीही विद्यार्थ्यांना शिकवणूक दिली जाणार आहे.