मुंबई – राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देत भाजपने चांगलीच राजकीय खेळी खेळली आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपने उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस उमेदवार रजनी पाटील यांच्याविरोधात ते निवडणूक लढवतील.
अशातच आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याने ही भेट झाल्याचं समजत. मात्र काँग्रेस नेत्यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष नाराज असल्याचे वृत्त आहे.
विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे संख्याबळ एकत्र करता महाविकास आघाडी बहुमतात आहे. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेस उमेदवार रजनी पाटील सहज राज्यसभेवर जातील. मात्र असं असतानाही पटोले, थोरात यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने काँग्रेसचा मित्रपक्षांवर विश्वास नाही का? असा प्रश्न इतर दोन पक्षांना पडला आहे.
तत्पूर्वी, संजय उपाध्याय यांची उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप व मित्रपक्षांचे बळ ११९ असून आणखी २०-२५ आमदार आमच्याकडे येऊ शकतात, असा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे.
फडणवीसांकडून काँग्रेसला गुगली
विधान सभेच्या मागील अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. ते निलंबन मागे घेण्यात यावे असा प्रस्ताव फडणवीस यांनी काँग्रेस समोर ठेवत गुगली टाकली. अर्थात राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने भाजप आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय काँग्रेसला इतर दोन पक्षांना विचारात घेऊनच घ्यावा लागेल.
रजनी पाटील यांचा विजय निश्चित
४ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील आणि भाजपाचे संजय उपाध्याय यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरले. महाविकास आघाडीकडे निर्भेळ बहुमत असल्याने रजनी पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले होते.