राजकोट – करोना महामारीच्या सध्याच्या भीषण परिस्थिती मध्ये करोना आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची भूक भागवणे हे सुद्धा एक जिकिरीचे काम झाले आहे. याची कल्पना आल्याने राजकोटमधील काही तरुणांनी स्वतःच्या पॉकेट मनीतील पैशांचा वापर करून रुग्णांचे पोट भरण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे.
एकाच घरातील सर्व जण जर या आजाराने त्रस्त असतील तर त्यांच्या जेवणाचे काळजी कोणी घ्यायची हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे. या महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असतानाच हॉटेल आणि रेस्टॉरंटही बंद होते. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या जेवणाची सोय करणे रुग्णालयाच्या व्यवस्थापनालाही शक्य होत नव्हते. अशा वेळी या तरुणांनी पुढाकार घेऊन या रुग्णांच्या जेवणाची सोय केली आहे.
राजकोट जवळील गोंडल नावाच्या शहरात राहणाऱ्या अनिल नावाच्या तरुणाच्या मनात ही कल्पना येताच त्याने आपल्या इतर मित्रांना विश्वासात घेतले आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणली. प्रथम या उपक्रमात तिघांनाच भाग घेतला होता, आता एकूण पंचवीस तरुण या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत आहेत. हे तरूण सर्वप्रथम आपल्या पॉकेटमनी चा वापर करून रुग्णांची जेवणाची सोय करत होते, पण त्यांच्या या उपक्रमाची माहिती मिळताच अनेकांनी त्यांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली.
या तरुणांनी आपल्या ग्रुपचे नाव अक्षय भारती असे ठेवले असून दररोज पंचवीस हजार रुपये खर्च करून ते 450 रुग्णांना दोन्ही वेळच्या जेवणाचा डबा पुरवण्याचे काम करत आहेत.
करोना ने आजारी असलेल्या रुग्णांना ज्या प्रकारच्या आहाराची गरज असते ते लक्षात घेऊनच या डब्यांमध्ये जेवण दिले जात आहे. एका डब्यामध्ये दोन प्रकारची भाजी डाळ भात सॅलड ताक आणि चपाती असा मेन्यू असतो रात्रीच्या खाण्यासाठी आमटी आणि खिचडी आणि सॅलड अशा प्रकारचा मेनू असतो. या तरुणांनी आपला मोबाईल नंबर सर्वत्र दिला असून ज्यांना जेवणाची गरज आहे त्यांनी संपर्क साधल्यास त्यांना जेवणाचा डबा मोफत दिला जातो.
या आजाराचा संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन डबा पोचवतानाही हे तरुण सर्व प्रकारची खबरदारी घेत असतात. याव्यतिरिक्त या तरुणांनी शहरातील काही गरीब लोकांना मोफत धान्य पुरवठाचा उपक्रमही सुरू केला आहे. लॉकडाउनच्या प्रक्रियेमुळे ज्यांचा रोजगार गेला आहे अशा लोकांची दोन्ही वेळच्या जेवणाची सोय व्हावी या कारणाने या निमित्ताने काय म्हणायचं हेतूने धान्य पुरवण्याचा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे.