कवठे (प्रतिनिधी) – सध्या देशभरासह राज्यात तसेच सातारा जिल्ह्यातही करोनाची दहशत आहे. वाई तालुक्यातील कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या आवाजानेच आता कवठे ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकतोय. याचे म्हणजे कारण म्हणजे आरोग्य केंद्रात आणला गेलेला रुग्ण करोनाशी संबंधित तर नाही ना हेच आहे. त्यामुळे कवठे आरोग्य केंद्रास स्वतंत्र रस्ता करुन देण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना 10 जुलै 1957 साली आद्य स्वातंत्र्यसैनिक किसन वीर यांच्या प्रेरणेतून धर्मादाय दवाखाना म्हणून करण्यात आली. तेंव्हापासून आजपर्यंत कवठे व परिसरातील जवळजवळ 15 गावातील रुग्णांची विनामुल्य सेवा करून या प्राथमिक आरोग्य केंद्राने आपला नावलौकिक वाढविला आहे. वाई तालुक्यातील पूर्व भागातील सुरूर, वेळे, चांदक, केंजळ, गुळूंब, मयुरेश्वर, वहागाव, मोहोडेकरवाडी, बोपेगाव, पांडे, शेंदूरजणे, खानापूर, ओझर्डे, जोशीविहीर, आनेवाडी या गावातील रुग्ण नियमित या दवाखान्यात आरोग्यसेवा घेत आहेत.
सध्या करोनाचे संकट गडद होत चालल्याने प्रत्येक गावाने आपल्या गावाच्या सीमा बंद केल्या असून परगावाहून येणाऱ्या नागरिकांना गावात प्रवेशासाठी बंदी करण्यात आलेली आहे. कवठे या गावातसुद्धा गावातील सात तरुण मंडळे आठवड्याचे वेळापत्रक ठरवून घेवून गावाच्या वेशीवर 24 तास खडा पहारा देत आहेत व कोणी आजारी व्यक्ती कवठे गावात पाहुण्यांच्याकडे मुक्कामी राहणार नाही याची दक्षता घेत आहे. परंतु या तरुणांचे या करोनाच्या संकटापासून गावाचा बचाव करण्याचे प्रयत्न हाणून पडत आहेत ते या आरोग्य केंद्रात येत असलेल्या बाहेरगावाच्या पेशंटमुळे. या आरोग्य केंद्रात दररोज जवळजवळ 100 ते 150 पेशंटची तपासणी केली जाते.
यामध्ये प्रतिमहिना रक्तदाब, शुगर व हृदयरोग याच्यावरील नियमित औषधे घेत असलेले पेशंटसुद्धा पुष्कळ आहेत. तसेच करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी या आरोग्य केंद्राच्यामार्फत ज्या त्या गावात या नियमित रुग्णांना औषधे देण्याची सुविधा केलेली असली तरी दररोज ताप, थंडी, सर्दी व अन्य रोगांनी ग्रस्त असे सरासरी 50 रुग्ण बाहेरगावावरून येत आहेत.
दवाखान्यात जातोय असे सांगितल्याने या रुग्णांना गावात प्रवेश दिला जातोय व चालत किंवा गाडीवर गावाच्या मधोमध असलेल्या रस्त्याने सदर रुग्ण दवाखान्यात जात आहेत. अंदाजे 50 बाहेरगावचे रुग्ण वेशीवरचा पहारा ओलांडून रितसर गावात येत असल्याने तरुणांनी केलेले गावरक्षणाचे प्रयत्न मात्र फोल ठरत आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र रस्ता करुन दिला जावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत 250 पेशंट कवारंटाईन करण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यासाठी ही इमारत सज्ज करण्यात आली आहे. महामार्गापासून 200 मीटर अंतरावर सदर दवाखाना आहे. महामार्गापासून सरळ या दवाखान्यापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात रस्ता केल्यास हे कोरोनाचे संकट टळेपर्यंत बाहेरगावावरून येणारे रुग्ण व क्वारंटाईन करण्यात येणारे रुग्ण यांचा गावाशी संपर्क येणार नाही तरी याबाबत प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत.
श्रीकांत वीर, सरपंच, ग्रामपंचायत कवठे.