पाथर्डी – रामजन्मभूमी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलिसांनी शहरात शांतता राहावी, यादृष्टीने शांतता समितीची बैठक आयोजित केली होती.
पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार, गोपनीय शाखेचे भगवान सानप, शांतता समितीचे सदस्य फारुक शेख, बाळासाहेब जिरेसाळ, अरविंद सोनटक्के, नसीर शेख, शन्नो पठाण, अमोल भंडारी, नितीन गटांनी, शहनावाज शेख, इजास शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी रत्नपारखी म्हणाले, रामजन्मभूमी व बाबरी मशिद वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. निकालानंतर शहरात शांतता राहील, याची सर्वांनी काळजी घ्यावी. त्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. निकाल काहीही असो, त्याचा आदर करून सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले.
निकालानंतर सोशल मीडिया, पत्रकबाजी, टीका, टिप्पणी करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात. समाजामध्ये चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या काळात शहरात जमाव करून थांबू नये. कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ, फोटो, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये. शहरात होणाऱ्या हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे. बेकायदेशीर वर्तन करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नपारखी यांनी सांगितले.