रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अन्यथा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
उरुळी कांचन – उरुळी कांचन ते जेजुरी या मार्गावर उरुळी कांचनपासून शिंदवणे घाटापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उरुळी कांचनसह शिंदवणेच्या ग्रामस्थांनी
दिला आहे.
उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात मोठ्या प्रमाणात वाहने जेजुरीला, केतकावळे बालाजी, तसेच सातारा, कोल्हापूर,सांगलीकडे जातात. मात्र उरुळी कांचन येथील नवीन कॅनालपासून शिंदवणे घाटापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.शिंदवणे परिसरात झालेल्या पावसामुळे येथील बोअरिंगमधून पाणी बाहेर पडत आहे. यामुळे ओढ्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे, तसेच शेतातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी येत असून ते पाणी रस्त्यावर येत आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या भागात गंभीर अपघात होत आहेत. याबाबत छाया रमेश महाडिक यांनी सांगितले की, शिंदवणे रस्ता सध्या त्रासदायक ठरत आहे. माजी सरपंच गणेश महाडिक यांनी सांगितले की, शिंदवणे रस्ता त्वरीत दुरुस्त करावा. याबाबत संबंधित खात्याबरोबर अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. योग्य प्रमाणात काम होत नसल्याने सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यावर पाणी साचले आहे. हा रस्ता लवकर दुरुस्त झाला नाही तर येथील ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.
येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्यास सांगणार आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निधी मागील आमदारांनी उपलब्ध केला होता; पण रस्त्याचे काम का सुरू झाले नाही. याबाबत देखील माहिती घेणार आहे. पाऊस सारखा पडत असल्याने नागरिकांनीपण सहकार्य करावे.
– अशोक पवार, आमदार, शिरूर हवेली