पाटण – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आहे. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांनी खाली घेण्यात आले होते. मात्र, दुपारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून विसर्ग वाढविला आहे. दरम्यान, तालुक्यातील 471 कुटुंबातील दोन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. धो- धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असताना महापुराच्या भीतीने पुरग्रस्तांची गाळण उडाली आहे. प्रशासन, नागरिक, सामाजिक संघटना, युवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावत आहेत.
मात्र, पावसाचा जोर कमी होत नसल्याने महापुराचे संकट आणखी गडद होत असल्याने तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापुरामुळे वाहतूक ठप्प झाल्याने दररोज लागणाऱ्या घरगुती गरजांचा नागरिकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. साठा करून ठेवलेले अन्नधान्य तसेच स्वयंपाकासाठी लागणारा गॅस उपलब्ध होत नसल्याने पाटण शहरासह सर्वच ठिकाणी नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. महापुराच्या रूद्रावतारापुढे प्रशासनानेही हात टेकले आहेत.
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारपासून पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे पाटण शहरातील सकाळी कमी झालेली पूर पातळी दुपारपासून पुन्हा वाढू लागली आहे. कोयना धरणाचे 16 फूटांवर असणारे दरवाजे 14 फूटांवर स्थिर करण्यात आले होते. मात्र, पुन्हा कोयना पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात तब्बल 1 लाख 33 हजार क्युसेक पाण्याची आवक वाढली होती. यामुळे पुन्हा धरणाचे दरवाजे 16 फूटांनी वर उचलून 1 लाख 27 हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याशिवाय पूर परिस्थिती नियंत्रणात येणार नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यात महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली असताना पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, पाटण, कोयना या विभागांमधील आजपर्यंत नावडी, सांगवड, चाफेर, घाटेवाडी, जमदारवाडी, कदमवस्ती, पाटण शहर असे एकूण 471 कुटुबांतील दोन हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
यासाठी कालपासून स्थानिक युवक, शासकीय यंत्रणा काम करत होती. महापूराची स्थिती गंभीर होत चालली असताना आमदार शंभूराज देसाई यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना फोन करून पूर परिस्थितीची माहिती दिली व पुरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफ टीम पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार रात्री उशीरा एनडीआरएफची टीम पाटण तालुक्यात दाखल झाली असून नावडी, जमदाडवाडी, निसरे, त्रिपुडी याठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलविले आहे.
म्हारवंडला जमीन तर पाबळवाडीचा रस्ता खचला
तालुक्यात सर्वत्र पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बोर्गेवाडी (ता. पाटण) येथील जमीन खचल्याची घटना ताजी असतानाच म्हारवंड येथील संपूर्ण डोंगरच गावच्या डोक्यावर येवून बसला आहे. त्यामुळे गावचा रस्ता बंद झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अर्धवट अवस्थेत असणारा उर्वरित डोंगर केव्हाही कोसळू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे. तर तारळे विभागातील पाबळवाडीचा रस्ता तीन फुटांनी खचला असून ग्रामस्थांच्या घरातून पाण्याचे उमाळे निघाले आहेत. यामुळे एक घर कोसळल्याची घटना पावळबाडीत घडली आहे. गणेवाडी, जामदाडवाडी, तामकणे, नावडी या ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडत आहेत.