नवी दिल्ली: रामदास आठवले यांच्याप्रमाणेच आणखी एक केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी जनतेला चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर, दैनंदिन कार्यालयीन कामकाजासाठी चीनी वस्तूंची खरेदी न करण्याचे आदेशही त्यांनी आपल्या अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिले.
पासवान येथे पत्रकारांशी बोलत होते. चीनची वर्तणूक पाहता त्या देशातील वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार टाकायला हवा. फर्निचर, दिव्यांसारख्या कमी दर्जाच्या चीनी वस्तूंची अवैध आयात हा चिंतेचा विषय आहे. भारतीय मानक विभागाने (बीआयएस) सर्व वस्तूंच्या दर्जासाठी नियम निश्चित केले आहेत. त्या नियमांची कडक अंमलबजावणी केंद्र सरकार चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंबाबत करेल.
आपल्या मालाची परदेशांत कसून तपासणी होते. आपला बासमती तांदूळ नाकारण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, भारतात आलेल्या मालाबाबत कठोर तपासणीचे मापदंड लावले जात नाहीत, अशी खंतही पासवान यांनी व्यक्त केली.