मुंबई – सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत भारतातील शेअर बाजार निर्देशाकानी चांगला परतावा दिला आहे. या आर्थिक वर्षामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 9,059 अंकांनी म्हणजे 18.29 टक्क्यांनी वाढला आहे. तर या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 2,774 अंकांनी म्हणजे 18.88 टक्क्यांनी वाढला आहे.
आज वर्षाच्या शेवटी जरी निर्देशांकात घट झाली असली तरी पूर्ण वर्षभरामध्ये निर्देशांकामध्ये भरीव वाढ नोंदली गेली आहे. या वर्षात धातू क्षेत्राचा निर्देशांक 50 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर माध्यम क्षेत्राचा निर्देशांकही 51 टक्क्यांनी वाढला असल्याचे दिसून आले. मुख्य निर्देशांकाबरोबरच मिड कॅप 100 आणि स्माल कॅप 100 हा 25 टक्क्यानी वाढला असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे या वर्षात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बरीच विक्री करून गुंतवणूक काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर राहिले असे एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी सांगितले.
सरलेल्या वर्षांमध्ये करोनाचा बराच प्रभाव जाणवत होता. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय कंपन्या चांगला परतावा देतील या दृष्टिकोनातून भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांनी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढते राहण्यास मदत झाली. मात्र आता महागाई वाढली असल्यामुळे अमेरिकेची रिझर्व बॅंक व्याजदर वाढ करीत आहे. त्यामुळे भारतीय निर्देशांकांना आगामी काळात परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराचा पूर्वीइतका आधार मिळणार नसल्याचे समजले जाते.
नफेखोरीमुळे शेअर निर्देशांकांत घट
गेल्या तीन दिवसांमध्ये शेअर बाजार निर्देशांकांत बरीच वाढ झाल्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. अशा अवस्थेत काही गुंतवणूकदारांनी नफेखोरी करून नफा काढून घेतल्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकांत घटा नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 115 अंकांनी कमी होऊन 58,568 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकांनी म्हणजे 0.19 टक्क्यांनी कमी होऊन 17,464 अंकांवर बंद झाला.