मुंबई : काही दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे करोना काळात वाढलेले तिकीट दर ३० टक्क्यांनी कमी होऊन पूर्वी इतके झाले. मात्र अजूनही प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे. प्रवासी आता सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत.
रेल्वे प्रशासन जवळपास ५४ घटकांना तिकीट दरात सवलत देते. कोविडपूर्वी ही सवलत दिली जात होती. सवलतीचा सर्वात जास्त फायदा ज्येष्ठ नागरिकांना मिळतो. मात्र जेव्हा रेल्वेने सर्वच गाड्यांना शून्य क्रमांक देऊन विशेष गाड्यांचा दर्जा दिला. तेव्हा त्या सवलती रद्द झाल्या.
आता पुण्यातून सुटणाऱ्या आणि व्हाया जाणाऱ्या बहुतांश गाड्या पूर्वीप्रमाणे नियमित झाल्या आहेत. मात्र अजूनही त्या गाड्यांतील प्रवाशांना पूर्वीप्रमाणे तिकिटात सवलत दिली जात नाही. तेव्हा सवलती पूर्वीप्रमाणे देण्यात याव्या, अशी मागणी आता प्रवासी वर्गातून होत आहे.