ऑगस्ट महिन्यामध्ये वाहन कंपन्यांना मिळाला दिलासा
नवी दिल्ली – प्रदीर्घ काळापासून मंदीत अडकलेल्या प्रवासी वाहन क्षेत्राला ऑगस्ट महिन्यात थोडासा दिलासा मिळाला आहे. या महिन्यात प्रवासी वाहन विक्री 14 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून वाहन विक्री वाढत नव्हती.
मात्र, ऑगस्ट महिन्यातील वाहन विक्रीमुळे फार आनंद मानण्याची गरज नाही, असे काही वाहन उत्पादकांनी म्हटले आहे. कारण गेल्या नऊ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांना वाहन खरेदी करण्याची इच्छा आणि गरज असूनही वाहन खरेदी करता आली नव्हती. ही साठून राहिलेली मागणी ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण होण्यास मदत झाली आहे. ही खरी मागणी नाही. आगामी काळात वाहन विक्रीवरील परिणाम कायम राहू शकतो, असे काही वाहन उत्पादकांनी बोलून दाखविले.
ऑगस्ट महिन्यासंदर्भात वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआम या संघटनेने म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये 2,15,916 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 1,89,129 वाहनांची विक्री झाली होती.
ऑगस्ट महिन्यात कारच्या विक्रीत 14 टक्के, बहुउपयोगी वाहनांच्या विक्रीत 15 टक्के, व्हॅनच्या विक्रीत 3 टक्के, मोटरसायकलच्या विक्रीत 10 टक्के वाढ झाली असली तरी स्कूटरच्या विक्रीत मात्र 12 टक्के घट झाली आहे. तीनचाकी वाहनांच्या विक्रीत ऑगस्ट महिन्यामध्ये 75 टक्के घट झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि वितरकांनी सरकारकडे सवलतीची मागणी केली आहे.
उत्सवात विक्री वाढण्याची आशा
भारतात दसरा आणि दिवाळीला वाहन खरेदी करण्याची परंपरा आहे. या दसरा आणि दिवाळीत वाहन विक्री वाढेल अशी आम्हाला आशा आहे, असे सिआमचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले. ते म्हणाले की, बॅंका आणि वित्तीय संस्थांनीही यावेळी कर्जपुरवठ्यासाठी तयारी करण्याची गरज आहे.