पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) पुणे-मुंबई मार्गावर प्रवासीच मिळत नसल्याचे चित्र आहे. 20 ऑगस्टपासून राज्यातील एसटी सेवा सुरळीत सुरू झाली.
तरीदेखील प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या वातानुकूलित शिवनेरीकडे प्रवाशांनी पाठच फिरवल्याचे दिसून येते. करोनाच्या धास्तीमुळे प्रवासी प्रवास टाळत असल्याची माहिती एसटीच्या पुणे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दै. “प्रभात’ला दिली.
पुणे-मुंबईदरम्यान करोनाच्या उद्रेकापूर्वी दररोज 5 हजार प्रवासी प्रवास करायचे. मात्र, गेल्या 20 दिवसांची आकडेवारी पाहता दररोजची प्रवासी संख्या अवघी 500 वर आली आहे. याचाच अर्थ प्रवासी संख्या दहापटीने कमी झाली आहे. करोना उद्रेकापूर्वी दररोज असणारी 300 फेऱ्यांची संख्या आता अवघी 30 वर आली आहे.
गतवर्षी म्हणजेच 1 ते 20 सप्टेंबर 2019 दरम्यान पुणे स्टेशन-दादर मार्गावर शिवनेरीच्या 1,251 फेऱ्या झाल्या; तर 27 हजार 163 प्रवाशांनी प्रवास केला. तर यंदा मात्र याच 20 दिवसांत (1 ते 20 सप्टेंबर 2020) पुणे स्टेशन-दादर मार्गावर शिवनेरीच्या 287 फेऱ्या झाल्या असून केवळ 3760 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.