तीन ते सहापट दरवाढ : सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांचा अभाव
पिंपरी (प्रतिनिधी) – करोनामुळे आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट केली जात आहे. नेहमीपेक्षा तीन ते सहा पट अधिक भाडे वसूल करण्यात येत आहे. वाढ करण्यात आली आहे. मात्र, नाइलाजास्तव प्रवाशांना पैसे एजेंट सांगतील त्या दरात तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ज्या आजाराला घाबरुन नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत, त्याबाबत खासगी ट्रॅव्हल्सकडून सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. सणासुदीच्या काळात ज्याप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्स ग्राहकांची लूट करतात, तसाच प्रकार सध्याही सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी त्यांना काहीही देणे-घेणे नसून केवळ पैसे कमाविण्याचा प्रकार सुरु असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
निगडी येथील बहुतांश ट्रॅव्हल्स एजंटचे दुकाने बंद आहेत, मात्र काही एजंटची दुकाने शटर खाली करुन सुरुच आहेत. निगडी, नाशिक फाटा येथून जात असलेल्या खासगी बसना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना करोनाचे कारण दाखवत तिप्पट तिकीट वसूल केले जात आहे. याबाबत आरटीओ कार्यालयाकडे विचारणा केली असता प्रवाशांनी आरटीओ कार्यालयाकडे तक्रार द्यावी यावर कारवाई केली जाईल असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या “करोना’ने शहरातही भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात “करोना’चे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. परिस्थितीचे गांभिर्य पाहता शहरात सर्व दुकाने, कार्यालये बंद करण्यात आली असल्याने कर्फ्यूसारखे वातावरण आहे. शुक्रवारी शहरातील हॉटेल आणि खानावळी देखील बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात राहत असलेल्या बॅचलर तरुणांनी देखील आता गावाकडची वाट धरली आहे. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे.
गाड्या एस.टी च्या काही लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, खासगी ट्रॅव्हल्स सर्रास सुरु असून करोनाची भीती दाखवत प्रवाशांना अव्वाच्या सव्वा रक्कम लुटली जात आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, तरी सुद्धा लपून छपून भाडेवाढ करून तिकीट वाढ करण्यात येत आहे.
एस.टी महामंडळाच्या बसपेक्षा दीड पट अधिक भाडे खासगी ट्रॅव्हल्स घेऊ शकतात. त्यापेक्षा अधिक भाडे वसूल करण्याची परवानगी नाही. मात्र, त्यापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करावी. संबधित एजंटवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कारवाई करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून पथक तयार करण्यात आले आहे.
– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
कोणतीही खबरदारी नाही
वाढता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एस.टी महामंडळाकडून 50 टक्केच प्रवासी तिरप्या पद्धतीने बसवले जात आहेत. तीन प्रवासी बसू शकतील अशा सीटवरही एकच प्रवासी बसविण्यात येत आहे.तर, रेल्वे गाड्यातील डब्ब्याचे निर्जंतुकीकरण केले जात आहेत. मात्र, खासगी ट्रॅव्हल्सकडून कुठलीही काळजी न घेत्ता. निव्वळ प्रवाशांची लूट करत असुरक्षित प्रवास केला जात आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्सवर वेळेतच आळा घालणे गरजेचे झाले आहे.