सहा “टीईटीं’मध्ये 86,298 उमेदवार उत्तीर्ण
परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळेना : 2014 मधील अनेक उमेदवारांना नोकरी नाही
पुणे – शिक्षकाच्या नोकरीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याचे बंधन आले. आतापर्यंत सहा वेळा परीक्षा घेण्यात आल्या, यात एकूण 86 हजार 298 उमेदवार उत्तीर्ण झाले. मात्र, मागील आठ वर्षांत शिक्षक भरती पुरेशा प्रमाणात झालीच नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. काही उमेदवारांच्या उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्राच्या पात्रतेची मुदतही संपत आली आहे. बऱ्याच उमेदवारांना शिक्षकी पेशाऐवजी नोकरीसाठी इतर पर्यायाचा अवलंब करावा लागला आहे.
सन 2012 नंतर “एनसीईआरटी’ने शिक्षक होण्यासाठी “टीईटी’ उत्तीर्णतेची अट घातली. शासनाने आधी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र वर्षातून एकदाच परीक्षा होत आहेत. परीक्षा परिषदेच्या वतीने “टीईटी’ परीक्षा घेण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. आतापर्यंत झालेल्या सहा परीक्षांच्या पेपर-1 मध्ये एकूण 42 हजार 713 तर पेपर-2 मध्ये 43 हजार 585 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात 15 डिसेंबर 2013 रोजी पहिल्यांदा “टीईटी’ झाली. या परीक्षेत पेपर-1 साठी 3 लाख 83 हजार 630 आणि पेपर-2 साठी 2 लाख 35 हजार 761 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात एकूण 31 हजार 72 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेचा निकाल मे 2014 मध्ये लागला. निकालाचे प्रमाणपत्र हे निकालाच्या तारखेपासून सात वर्षच पात्र असते. त्यामुळे पहिली परीक्षा दिलेल्या उमेदवारांची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. यातील बहुसंख्य उमेदवारांना अद्यापही शाळांमध्ये नोकरी मिळालेली नाही, हे आश्चर्यच आहे.
राज्यात सन 2012 नंतर शिक्षक भरती बंदी होती. गेल्या वर्षी शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्यात आली असली, तरी पवित्र पोर्टलमार्फतच शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
करोनामुळे शासनाने सर्वच नवीन पदभरतीस बंदी घातली आहे. यामुळे उर्वरित शिक्षक भरतीलाही अडचण निर्माण झाली आहे.
शिक्षक भरतीबाबत न्यायालयीन प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य शासनाकडूनही कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने “टीईटी’ उत्तीर्ण होऊनही अनेकांना नोकरी नाही. “टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबतही काहीच कारवाई होत नाही. नोकरीसाठीची वयोमर्यादाही संपत आल्याने अनेक उमेदवारांनी शेती, व्यवसाय, खासगी कंपन्यामध्ये नोकरीचा मार्ग स्वीकारला आहे.
– विठ्ठल सरगर, शिक्षक उमेदवार प्रतिनिधी