उमेश सुतार
रस्तेच तुटल्याने दळणवळण ठप्प
रस्त्याचे झालेत दोन-दोन भाग; घरांमधून सुरु आहेत पाण्याचे उमाळे
मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ
पाठवडे, बाटेवाडी, विरेवाडी येथील लोकांचा पशुपालन हा मुख्य व्यवसाय असल्याने प्रत्येकाकडे कमीतकमी चार-पाच जनावरे तरी आहेत. जमिन कमी असली तरी जनावरांच्या दूधावर येथील कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अतिवृष्टीच्या काळात जनावरांसह लोकांना ये-जा करणारा रस्ताच तुटल्याने अक्षरश: या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे घराघरात सुरु असलेल्या जनावरांच्या हंबरड्यावरुन येथील भयावह स्थिती दिसून येत आहे
कराड – चाफळ विभाग हा दुर्गम व डोंगराळ असा भाग असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा विभागातील विरेवाडी, पाठवडे, बाटेवाडी गावास अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रस्ते जागोजागी खचल्याने भयावह अवस्था निर्माण झाली आहे. मंदीर, स्मशानभूमीच्या इमारतीसह घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
अतिवृष्टीने या विभागातील गावांचे संपर्क तुटल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाने आमच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा टाहो डोंगरभागातील जनतेने फोडला आहे. अशा एक ना अनेक समस्यांच्या दलदलीत सापडलेल्या पाठवडेकरांना जिवंतपणीच मरण यातना भोगाव्या लागत आहेत.
चाफळ विभागातील पश्चिमेस डोंगरकपारीत वसलेल्या पाठवडे या छोटाशा गावातील लोकांचा पशुपालन व शेती ही उदरनिर्वाहाची प्रमुख साधने आहेत. शेतीच्या उत्पन्नावर काही लोकांचा चरितार्थ चालतो. अशा बिकट अवस्थेत राहणाऱ्या या लोकांवर अतिवृष्टीमुळे आणखी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. येथील लोकांच्या जमिनी अतिवृष्टीने पूर्णपणे खचून गेल्याने शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रस्त्याचे ठिकठिकाणी दोन-दोन भाग झाल्याने जनावरांनाही चरण्यास बाहेर सोडता येईना. अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
स्मशानभूमी शेड खचल्यामुळे गावात एखादी दु:खद घटना झाली तरी शेडअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. घरांमध्ये पाण्याचे पाण्याचे उमाळे फुटल्याने संपूर्ण घरांमध्ये ओल पसरली आहे, त्यामुळे झोपण्याची गैरसोय होत आहे.
उत्तरमांड नदीचा उगमस्थान असलेल्या ग्रामदैवत मांडकेश्वर मंदिराजवळील जमीन खचल्याने मंदिरास धोका निर्माण झाला आहे. विरेवाडी ते पाठवडे रस्ता जागोजागी खचल्याने या गावचा संपर्क विरेवाडीशी तुटला आहे. रस्ताच नसल्याने पाळीव जनावरे बांधून ठेवावी लागत आहेत. त्यामुळे मुक्या जनावरांवरही उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.
प्रशासनाने रस्ता, स्मशानभूमी व मांडकेश्वराचे अस्तित्व टिकवण्यासाठी तातडीने पाऊले उचलून गैरसोय दूर करावी. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, या काळात युवानेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी या गावास भेट देत येथील जनतेला मायेचा आधार देत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. तर आ. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधारचे तालुकाध्यक्ष भरत साळुंखे यांनी तिन्ही गावातील सरसकट लोकांना मदतीचे वाटप केले. दळणवळणाचा मार्ग बंद झाल्याने येथील ग्रामस्थांना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उत्तरमांड नदीचे उगमस्थान असलेल्या मांडकेश्वरास आपले ग्रामदैवत मानून पाठवडे, विरेवाडी, बाटेवाडी यासह पठारावरील गावातील लोकांनी लाखो रुपयाची वर्गणी गोळा करुन या मंदीराचा जिर्णोध्दार केला आहे. मात्र या मंदीराला अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला असून मंदीराची संरक्षक भिंत पडली आहे. त्यामुळे या मंदीराला धोका निर्माण झाला आहे.
उत्तरमांड नदीच्या उगमस्थानाचे जतन करण्यासाठी शासनासह समाजातील विविध घटकांनी सामुहिकपणे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी या गावातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात. तसेच बिकट अवस्था झालेल्या रस्त्याच्या कामाला प्राधान्यक्रम देवून येथील जनतेची होत असलेली गैरसोय दूर करावी. अशी मागणी विभागातील जनतेमधून होत आहे.
अतिवृष्टीने आमच्या गावात होत्याच नव्हतं झाले आहे. रस्ते तुटल्याने जनावरांसह लोकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एक वेळ आम्हाला खायला नाही मिळाले तरी चालेल. पण जनावरांसाठी तरी रस्ता सुस्थितीत होणे गरजेचे आहे.
– रामचंद्र झोरे, पाठवडे