पुणे – पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी हक्काने मिळावीत, यासाठी सातत्याने विरोधी पक्षाच्या सरकारच्या वेळी लढा दिला. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यावर वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावरील घरे मालकी हक्काने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा विशेष आनंद असल्याच्या भावना पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ सहकारनगर परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
शासनाने काढलेल्या आधीच्या आदेशात स्पष्टता नव्हती. त्यामुळे आपण सातत्याने सुधारीत आदेशासाठी पाठपुरावा केल्याने नवीन अध्यादेशामळे सोसायट्यांसाठी नियमावली, दंड आणि अन्य कायदेशीर बाबींबाबत पुरेशी स्पष्टता आहे. या निर्णयाचा शहरातील १०३ सोसायट्या, चार हजार कुटुंबं आणि ८० हजार पुणेकरांना लाभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप आरक्षणातील काही ठराविक जमीन वगळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सुमारे सात एकरचे तीन भूखंड वगळण्याची अधिसूचना नगर विकास विभागाने काढली होती. या ठिकाणच्या सर्व भूखंडधारकांसाठी एकच निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तत्काळ निर्णयाला स्थगिती दिली.”
– माधुरी मिसाळ (महायुतीच्या उमेदवार)
यावेळी माजी नगरसेवक महेश वाबळे, गणेश घोष, अनिल जाधव, प्रशांत थोपटे, श्रृती नाझीरकर, सुधीर कुरुमकर, हरीष परदेशी, बिपीन पोतनीस, रामदास गाडे, औदुंबर कांबळे, अपर्णा कोरपे, दत्ता टिकेकर, रफीक शेख, रवींद्र चव्हाण, अमोल खंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.