नगर – जिल्हा पारिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विखे गट काही चमत्कार करतो का असा होरा राजकीय वर्तुळातून बांधला जात होता. ुपण नव्या नियमाचा पक्षादेश अर्थात व्हीप या निवडणुकीत अत्यंत महत्वपूर्ण ठरला गेला. अन येथेच विखेंचे गणित फसले गेले. त्यांना फोडाफोडीला वावच राहिला नाही. काल ज्यावेळी तत्कालीन अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी मी निवडणूक लढविणार नाही असे जाहीर केले, त्याचवेळी या निवडणुकीचा अंदाजही आला अन यातील रंगतही संपली.
या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे गटाने भाजपची मदत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, मात्र मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेल्या तेरा सदस्यांनी गटनेता बदलून विखेंचा गटनेता बाजूला काढून त्या ठिकाणी थोरात गटाचा गटनेता अजय फटांगरे यांना नेमल्यामुळे विखे यांचे गणित या निवडणुकीमध्ये चुकणार हे स्पष्ट केले होते.
आज भाजपाच्या झालेल्या बैठकीमध्ये या सर्व विषयांवर चर्चा झाली. संख्याबळ आपले जुळत नाही. जर विखे गटाने पक्षादेश पाळला नाही तर त्यांचे सदस्यत्व रद्द होणार हे ज्यावेळेला लक्षात आले त्या वेळेला फक्त उमेदवारी अर्ज दाखल करायचा व ऐन वेळेला माघारी घ्यायच्या असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.
भाजपने अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या पदाकरता दोन नावे दिले खरी मात्र माघारीच्या वेळेला या दोघांनीही माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीला अध्यक्ष-उपाध्यक्षपद बिनविरोध मिळाले आहे. जर निवडणूक झाली असती तर महाविकास आघाडीचे पारडे जड होते. त्यांच्याकडे 47 आकडा झालेला होता. भाजपकडे अवघे तेरा सदस्य राहिले होते. संख्याबळ न जुळत असल्यामुळेच भाजपने या निवडणुकीतून काढता पाय घेतला.
विखे गट कॉंग्रेसमधून बसला बाजूला
कॉंग्रेसचे 23 सदस्य आहेत.यातील विखे यांच्याकडे 10 सदस्य होते. त्यांनी सभागृहामध्ये स्वतंत्र बसण्याचा निर्णय घेतला. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्यासोबत त्याच्या गटाच्या दहा सदस्यांना व्हीप देताना कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांना विखे यांनी चांगलेच सुनावले. त्यातच सदस्य राजेश परजणे यांनीही आम्हाला विश्वासात का घेतले नाही असा आरोप केला. सभागृहांमध्ये त्यांना कॉग्रेसकडून व्हीप बजावण्यात आला असला तरी ते बाजूला बसले होते.