मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि कॉंग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ, असे आव्हानही पवारांना दिले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाला हे सरकार 5 वर्षे टिकणार आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा असं म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही.
तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि कॉंग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.
पुढील निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी वेगवेगळं लढायचं असं ठरवू आणि लढून बघू. या येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर चारही पक्षांपैकी कुणाला किती बेस किती आहे हे बघू, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.