नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एक बैठक घेतली होती. बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर जोर देण्याचे संकेत देण्यात आले. तसेच पक्षविरोधात होणाऱ्या कारवायांबाबतही त्यांनी कठोर शब्दात इशारा दिला. विरोधकांच्या संपर्कात असणारे पक्ष सोडण्यास मुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली.
दरम्यान, या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पंरतु पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या इशारा हा मंत्रिमंडळातून राजीनामा देणारे नेते शुभेंदु अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या काही अन्य आमदारांविरोधात होता. जर एक नेता पक्षातून बाहेर पडला तर त्यांच्यासारखे एक लाख नेते आपण तयार करू शकतो असे ममता बॅनर्जी यांनी म्हटल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी शुभेंदु अधिकारी यांचे वडील आणि पुरबा मेदिनीपुर टिएमसी प्रमुख तसेच कांथी येथील खासदार शिशीर अधिकारी यांच्याशीही चर्चा केली. तसंच पक्षविरोधी कारवाया आणि जिल्हा स्तरावरील विरोध संपवण्यास सांगितले. शिशीर अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिल्याचे एका नेत्याने सांगितले.
या बैठकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच टीएमसीच्या शेतकऱी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी कृषी कायद्यांविरोधात मध्य कोलाकातातील महात्मा गांधी यांच्या प्रतीमेसमोर तीन दिवसीय आंदोलन करण्याचे निर्देशही त्यांनी दिली. तसेच पक्षविरोधी कारवाई सहन केली जाणार नसून विरोधकांच्या संपर्कात असलेले पक्ष सोडण्यासाठी मुक्त आहेत असेही त्या म्हणल्या.