पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने यंदाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी आणि करोनामुक्ती जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन अभियान व वृक्षारोपण उपक्रम’ दिंडीचे आयोजन दि.22 जून ते 10 जुलै दरम्यान करण्यात येणार आहे.
आळंदी-देहू ते पंढरपूर मार्गावर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना संलग्नित महाविद्यालयातून 140 स्वयंसेवक, शिक्षक व राज्यभरातील सुमारे 50 स्वयंसेवक, शिक्षक व 40 शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 190 जण सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील इच्छुक एक स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकाऱ्यांची नावे विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने दि.17 जूनपर्यंत पाठविण्यात यावी, अशी माहिती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रभाकर देसाई यांनी दिली.
स्वच्छतेचा मूलमंत्र कृतीतून पोहोचविणे. सार्वजनिक इमारतींचे आणि स्थळाचे निर्जंतुकीकरण, कुटुंबाचे सर्वेक्षण, रक्तदान आणि गावागावात रक्तदान शिबिरे, देशी फळझाडांची लागवड, करोनामुळे निर्माण झालेले गैरसमज दूर करणे, त्यासाठी सामाजिक माध्यमात मोहीम राबवणे, असे प्रबोधन या दिंडीद्वारे करण्यात येणार आहे.