अंधत्व येण्याची भीती; शोधनिबंधात धक्कादायक माहिती उघड
पुणे – मधुमेहामुळे डोळ्याच्या पडद्याला आलेली सूज किंवा वयोमानामुळे पडद्याची झालेली झीज यामुळे रुग्णाला वर्षभरात सहा ते सात इंजेक्शन घ्यावे लागतात. त्यासाठी साठ हजार ते एक लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा खर्च परवडत नसल्याने निम्म्याहून अधिक रुग्ण हे उपचार अर्ध्यावरच सोडत असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली. मात्र, असे अर्धवट उपचार सोडल्यामुळे अंधत्व येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेमध्ये (एनआयओ) डोळ्यांच्या पडद्याची झीज झालेल्या रुग्णांनी उपचार घेतले. जानेवारी 2013 ते 2017 डिसेंबर या चार वर्षांत सुमारे 1,250 रुग्णांनी उपचार घेतले. त्यापैकी उपचार थांबविलेल्या रुग्णांचा गेल्या वर्षभरात पाठपुरावा करून त्या अभ्यासाचे निष्कर्षाचा शोधनिबंध नुकताच इंडियन जर्नल ऑफ ऑप्थोमॉलॉजी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये सुमारे 55 टक्के रुग्णांनी उपचार अर्धवट सोडल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये 65 टक्के पुरूष, तर 35 टक्के महिलांचा समावेश आहे.
त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, त्या रुग्णांना या इंजेक्शनचा खर्च परवडत नसल्याची माहिती समोर आली. अशा रुग्णांनी पुन्हा नेत्रतज्ज्ञांकडे गेल्यास त्यांच्या दृष्टीला आणखी धोका होण्याची शक्यता डॉ. आदित्य केळकर यांनी व्यक्त केली.
या संशोधनात नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांच्यासह डॉ. रोहित शेट्टी, डॉ. जाई केळकर, डॉ. निखिल लाभटेवार, डॉ. अभिषेक पंडित, डॉ. माधुलिका मालोदे आणि डॉ. सायली तिडके यांनी सहभाग घेतला.
खर्च विम्याद्वारे देण्याची अपेक्षा
उपचाराचा खर्च परवडत नसल्याने उपचार सोडलेल्यांची संख्या न मोजता येणारी आहे. हीच अवस्था डोळ्यांच्या उपचारासाठी इंजेक्शनचा खर्च परवडत नसल्याने अर्धवट उपचार थांबविणाऱ्यांची संख्या 55 टक्के आहे. त्यामुळे या रुग्णांना इंजेक्शनचा खर्च विम्याद्वारे दिला, तर त्यांना वेळेवर उपचार मिळतील आणि दृष्टी वाचू शकेल. त्याकरिता या रुग्णांच्या उपचाराचा खर्च कॅशलेस व्हावा अशी अपेक्षा डॉ. आदित्य केळकर यांनी व्यक्त केली.