मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीस लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर आर्थिक राजधानी असलेली मुंबई विषाणूचा प्रमुख हॉटस्पॉट ठरली होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील रुग्णसंख्या कमालीची घटल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले असून शहरात गेल्या २४ तासांमध्ये १३६१ नवे रुग्ण आढळून आलेत. ही गेल्या १३१ दिवसांतील सर्वोच्च रुग्णसंख्या आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करताना शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत ‘अंशत: लॉक डाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल’ असे संकेत दिलेत. एका नामांकित इंग्रजी दैनिकाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलीये.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसतीये. राज्यात रविवारी एका दिवसात ११ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. रविवारचा रुग्णसंख्येचा आकडा गेल्या १४१ दिवसांमध्ये सर्वाधिक आकडा ठरलाय.
यापूर्वी, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना रुग्ण वाढीची माहिती बैठकीत सादर करताना वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षाही आता अधिक रुग्ण वाढत असल्याची माहिती देण्यात आली.
राज्यात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या देखील एक लाखाच्या (९७,९८३) जवळ पोहोचली आहे. यात मुंबईत सध्या ९ हजार ३१९ सक्रीय रुग्ण आहेत. लवकरच हा आकडा देखील १० हजारांचा टप्पा ओलांडेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.