मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्यांचे सलामीवीर चांगली सुरुवात करुन देण्यात कमी पडत आहेत. अशा वेळी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सलामीला फलंदाजी केली तर त्यांच्या कामगिरीत निश्चितच बदल होईल, असे मत माजी कसोटीपटू पार्थिव पटेल याने व्यक्त केले आहे.
या मोसमात चेन्नईची कामगिरी इतकी सुमार झाली आहे, की यापूर्वी त्यांच्याकडून अशी कामगिरी कधीही घडलेली नाही. संघातील सर्वात जास्त अनुभवी खेळाडू म्हणून धोनीकडे पाहिले जाते, मग त्यानेच डावाची सुरुवात केली व मोठी सलामी दिली तर नंतर फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूंचाही आत्मविश्वास वाढलेला असेल, असेही पटेलने सांगितले.
आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून चेन्नईचा प्रत्येक सामना पाहिल्यावर असे लक्षात आले की त्यांना पहिल्या पाच ते सात षटकांत खेळपट्टीवर तग धरून उभे राहत वेगाने धावा करणाऱ्या सलामीवीराची गरज आहे. धोनीला मोठा अनुभव आहे व त्यानेच जर एक प्रयोग म्हणून सलामीला फलंदाजी करुन पाहायला काय हरकत आहे, असेही पटेल म्हणाला.
चेन्नईच्या फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही अपयशी कामगिरी होत आहे. एकेकाळचा हा विजेता संघ उतरणीला लागल्याची टीका होत असली तरीही धोनीच्या अनुभवाच्या जोरावर हाच संघ यंदाही विजेतेपदापर्यंत धडक मारु शकतो. आता धोनीलाच खेळाडूंना सरस कामगिरीसाठी प्रोत्साहीत करावे लागणार आहे, असेही पटेलने म्हटले आहे.