नवी दिल्ली – काही खासदारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे संसदेचे चालू पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याच्या मध्यातच अधिवेशनाची सांगता होण्याचे संकेत मिळत आहेत.
करोना संकटामुळे यावेळी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यातून अधिवेशनासाठी 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला. पण, अधिवेशन काळात काही खासदारांना करोनाची लागण झाली. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज पूर्ण 18 दिवस चालवणे धोक्याचे ठरेल, अशी भूमिका काही विरोधी पक्षांनी सरकारपर्यंत पोहचवली. त्यानंतर शनिवारी येथे लोकसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.
त्या बैठकीला बहुतांश पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यांनी अधिवेशन आटोपते घेण्याला अनुकूलता दर्शवली. त्यामुळे पुढील आठवड्यात अधिवेशन समाप्त होण्याची चिन्हे आहेत. त्याविषयीचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाची संसदीय कामकाजविषयक समिती घेईल.