भोपाळ – देशासाठी करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरली. यामध्ये काहींच्या डोक्यावरील माता-पित्याचे छत्र हरपले तर काहींनी वृद्धापकाळातील आधार गमावला. या महासाथीमुळे अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून यातून सावरायचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच अवघ्या दोन महिन्यांपूर्वी करोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या वनिशा पाठक या इयत्ता १० वी मधील विद्यार्थिनीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथील वनिशाने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १० वी मध्ये उत्तुंग यशाला गवसणी घातली. इयत्ता १० वी मध्ये ९९.८ टक्के गुणांसह ती शहरातील ‘टॉपर’ ठरली आहे. मात्र तिचं हे यश साजरी करायला आज तिचे आई-बाबा मात्र तिच्यासोबत नाहीयेत.
“माझ्या आई वडिलांच्या आठवणींनी मला प्रेरित केलं आणि ही प्रेरणा जीवनभर माझ्यासोबत राहील. मात्र माझा लहान भाऊ हा माझ्यासाठी सध्या प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत आहे. जेव्हा मी माझ्या लहान भावाकडे पाहते तेव्हा मला याची जाणीव होते की त्याच्याकडे तर आता आपलं म्हणायला केवळ मीच आहे. मला त्याच्यासमोर उदाहरण कायम करायचं होत की तो माझ्याकडून पाहून म्हणू शकेल की मला देखील दीदी सारखं करून दाखवायचं आहे.” हे सांगताना वनिशाच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते.
वनिशाचे वडील जितेंद्र कुमार पाठक हे एक आर्थिक सल्लागार होते. तिच्या आई डॉ. सीमा पाठक या एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक होत्या. आई सीमा यांचं ४ मे रोजी करोना उपचार सुरु असताना निधन झालं. आईच्या जाण्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या वनिशा आणि तिच्या लहान भावाला वडिलांच्या जाण्यानं पोरकं केलं. जितेंद्र कुमार पाठक यांचा १५ मे रोजी करोना उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
“मृत्यूपूर्वी माझ्या आईने मला, ‘स्वतःवर विश्वास ठेव आम्ही लवकरच परत येऊ’ असं सांगितलेलं. रुग्णालयात असताना २-३ वेळा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं. पप्पांसोबत १० मे ला अखेरचं बोलले, त्यांनी मला, ‘हिमतीने काम घे तुम्ही दोघांनी आमची खूप साथ दिली’ असं म्हंटलं. माझ्या वडिलांचं स्वप्न होत की, मी आयआयटीमध्ये शिक्षण घ्यावं. आईला वाटायचं की, मी युपीएससी परीक्षा पास व्हावं आणि देशाची सेवा करावी. त्यांचं स्वप्न आता माझं स्वप्न आहे.” वनिशा सांगते.
दीदीने मिळवलेल्या यशामुळे लहान भाऊ विवान देखील प्रेरित झाला असून मी देखील १०० टक्के गन मिळवेन असा विश्वास त्याने व्यक्त केला.
करोनाच्या राक्षसाने आई-बाबांना हिरावून नेल्याने वनिशा आता आपल्या मनातील भावनांना वाट करून देण्यासाठी शब्दांचा आधार शोधते. तिने लिहलेली ही कविता…
भारी मन से, मैं आपको अलविदा कहती हूं…
आपने मुझे रोने के लिए बिल्कुल अकेला छोड़ दिया
अब हर आंसू में आपकी याद आती है,
लेकिन मैं इन्हें रोक लेती हूं, बहने नहीं देती…
दर्द मुझ पर हावी नहीं होगा…
मैं आपके गर्व का कारण बनूंगी..
किसी दिन फिर से मिलने की उम्मीद के साथ…
वनिशा आणि तिचा लाहान भाऊ विवान हे आता आपले मामा डॉ. अशोक कुमार यांच्याकडे वास्तव्यास आहेत. मामी डॉ. भावना शर्मा मुलं इतकी लहान असतानाही त्यांनी स्वतःवर ओढवलेल्या दुःखाचा डोंगर मागे सारत आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगतात.