पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने अकरावी प्रवेश स्थगित करण्यात आले. त्यास दोन आठवडे उलटून गेले, तरी अद्याप प्रवेशाविषयी काहीच स्पष्टता नसल्याने अकरावी प्रवेश प्रवेश प्रक्रियेविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशावरून पालक व विद्यार्थी चितेंत आहेत. जवळपास पाच लाख विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या महापालिकांच्या क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत 5 लाख 59 हजार जागांवरील प्रवेशांसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार यंदा प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.
तर दुसऱ्या फेरीच्या प्रवेशांसाठी गुणवत्ता यादी 10 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आता मराठा आरक्षणाच्या निर्णयावर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रवेश प्रक्रियेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 83 हजार 329, अमरावतीमध्ये 12 हजार 138, औरंगाबादमध्ये 19 हजार 559 , मुंबईमध्ये 2 लाख 48 हजार , नागपूरमध्ये 35 हजार 964 आणि नाशिकमध्ये 26 हजार 18 अशा 4 लाख 25 हजार 628 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. पहिल्या फेरीत कोट्यातील प्रवेशांसह 1 लाख 46 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली.