पुणे -पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
विधान भवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.
जी-20 परिषदेअंतर्गत डिजिटल इकॉनॉमी गटाची बैठक 11 ते 13 जूनदरम्यान पुणे येथे होत असून या कालावधीत पालखी शहरात मुक्कामी आहे. यावेळी जी-20 बैठकीसाठी 25 देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. दोन्हींच्या अनुषंगाने पोलिसांकडून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून परदेशी पाहुण्यांना आपल्या वारीच्या समृद्ध परंपरेचे, संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
झेंडेवाडी घाटात विशेष आंतररुग्ण कक्ष
दिवे घाटाची चढण झाल्यानंतर भाविकांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन झेंडेवाडी घाटात 10 खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची स्थापना करण्यात येणार असून कार्डियाक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. डायल 108 सेवेच्या एकूण 30 आणि 102 सेवेच्या एकूण 110 रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या असून दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी 39 आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. 87 बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची एकूण 24 पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, 33 औषधोपचार उपकेंद्रे, 2 फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके, अशी 146 पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली.
समस्यांबाबत दर आठवड्याला बैठक
या बैठकीत सर्वच संस्थानांनी पालखी सोहळ्यादरम्यान येत असलेल्या समस्यांची उजळणी केली. त्यात प्रामुख्याने पालखीतळाच्या जागेबाबत सर्वच संस्थानांच्या प्रमुखांनी तक्रारी केल्या त्यावर पालकमंत्री पाटील यांनी यासंदर्भात दर आठवड्याला विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संस्थांचे प्रमुख तसेच प्रशासकीय अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन पालखी सोहळ्यात येणाऱ्या समस्यांच्या संदर्भात उपायोजना करणार आहे.
गायरानबाबत नंतर निर्णय
यावेळी देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले की, देहूमध्ये सोहळा सुरू असताना वारकऱ्यांना थांबण्याची सोय नाही, या ठिकाणी एक गायरान आहे. त्याची जागा 35 एकरांवर पसरलेली आहे. हे गायरान वारकऱ्यांसाठी आरक्षित करावे जेणेकरून देहूत वर्षभर येणाऱ्या वारकऱ्यांची सोय होईल. याबाबत पाटील यांनी यंदाच्या वर्षात ही समस्या येणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच या गायरानावर अनेक सरकारी संस्थांसह इतर स्वयंसेवी संस्थांनीही दावा केलेला आहे. त्याबाबत पालखी सोहळ्यानंतर स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या सूचना
उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टॅंकर ठेवावेत.
आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. पुणे शहरात महापालिकेने पालखीच्या मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर पाणी, आरोग्य पथक, शौचालये उभारावीत.
आळंदी, देहू, सासवड आदी ठिकाणी पालखीप्रस्थानापूर्वी मुक्कामास येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
पालखीच्या अनुषंगाने पालखी मुक्काम, विसावा आणि मार्गावरील गावांना देण्यात येणारे अनुदान लवकरात लवकर द्यावे.
सर्व पालख्यांच्या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, साईड पट्ट्या भराव्यात. हरीत वारी, निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग घ्यावा. 10 हजार वृक्षलागवडीचे नियोजन करा.