काबुल : अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबानकडून देशावर ताबा मिळवण्यापूर्वी काबूल सोडल्याबद्दल लोकांची माफी मागणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. अफगाण लोकांशी त्यांची बांधिलकी कधीही डगमगली नाही. तसेच हा अनुभव आयुष्यभर मार्गदर्शन करेल. अफगाणिस्तानमधील युद्ध वेगळ्या पद्धतीने ते समाप्त करू शकले नाहीत, असे म्हणत घनी यांनी माफी घातली.
बंदुका न उचलून काबूलमधील ६० लाख लोकांना वाचवण्यासाठी आपण देश सोडला, असंही ते म्हणाले आहेत. तसेच देशाच्या कोषागारातून लाखो डॉलर्स रोख रक्कम घेऊन काबूल सोडल्याच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी तालिबानने देशावर कब्जा मिळवण्यानंतर यूएईमध्ये पळून गेले. त्यांच्यावर तालिबानच्या नेतृत्वाखाली अनिश्चिततेच्या गर्तेत देशाला सोडून पळून गेल्यामुळे जगभरातून टीका झाली.
Statement 8 September 2021 pic.twitter.com/5yKXWIdLfM
— Ashraf Ghani (@ashrafghani) September 8, 2021
त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले की, “तालिबानने अनपेक्षितपणे शहरात प्रवेश केल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी अचानक काबुल सोडल्याबद्दल मी अफगाण लोकांना स्पष्टीकरण देतोय. पॅलेसच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर मी देश सोडला. त्यांनी मला १९९०च्या गृहयुद्धाप्रमाणे शहराच्या रस्त्यांवर लढाई होईल, असे म्हटले होते. काबूल सोडणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. पण बंदूक न घेता काबूल आणि देशातील ६० लाख लोकांना वाचवण्याचा हा एकमेव मार्ग होता,” असे घनी यांनी म्हटले.
अशरफ घनी हे सप्टेंबर २०१४ ते ऑगस्ट २०२१ या दरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. घनी म्हणाले की, “मी लोकशाही, समृद्ध आणि सार्वभौम राज्य उभारणीसाठी अफगाण लोकांना मदत करण्यासाठी आपल्या आयुष्याची २० वर्षे समर्पित केली आहेत. त्यामुळे या लोकांचा किंवा त्या दृष्टीचा त्याग करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.” तसेच “मी आणि माझी पत्नी आमच्या वैयक्तिक आर्थिक गोष्टींबाबत सावधगिरी बाळगतो. मी माझी सर्व मालमत्ता सर्वांपुढे जाहीर केली आहे. मी माझ्या मालमत्तेसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारीतील कोणत्याही अधिकृत ऑडिट किंवा आर्थिक तपासाचे स्वागत करतो.”
“मी गेल्या ४० वर्षांपासून सर्व अफगाणी, विशेषत: अफगाण सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बलिदानाबद्दल मनापासून कौतुक आणि आदर व्यक्त करतो. स्थिरता आणि समृद्धीची खात्री न करता माझा कार्यकाळ हा माझ्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणेच संपला हे अत्यंत गंभीर आणि दु: खद आहे,” असेही ते म्हणाले.