चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट येत्या 20 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यादरम्यान हलक्या वजनाच्या गाड्यांची वाहतूक पर्यायी कळबस्ते मार्गाने वळवण्यात येणार आहे, मात्र जड वाहनांची वाहतूक दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत पूर्णपणे बंद असणार अशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंदुधुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार पोलीस चौक्या उभारल्या जाणार आहेत. अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग नसल्याने अवजड वाहतूक दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत बंद राहिल. पावसाळ्यात परशुराम घाटात दरडी कोसळू नये यासाठी पुढील वीस दिवसात परशुराम घाटातील 1 लाख 60 हजार क्युबीक मीटर माती काढण्यात येणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
मुंबई- गोवा महामार्ग हा कोकणातील डोंगरदऱ्यांत तयार केलेला नागमोडी वळणाचा महामार्ग आहे. काही वर्षांपूर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात झाली. यात अनेक अडचणी आल्या. पावसाळ्यादरम्यान या मार्गावर दरड कोसळण्याच्या अनेक घटना समोर आल्याने वाहतूकीसाठी धोका निर्माण झाला. तसेच नवा रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या. या पार्श्वभूमीवर परशुराम घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्न सुरु आहेत.