मुंबई – मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळं संपूर्ण देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्यावरून राष्ट्रवादीने देशमुख यांचा राजीनामा न घेता या प्रकरणाच्या चौकशीची भूमिका घेतली. दुसरीकडे सिंग यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातील आरोपाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
दरम्यान अनिल देशमुख यांच्याविरोधात अनेक आयपीएस अधिकारी बोलतात. देशमुख यांच्याविरोधातील पुरावे देखील अधिकाऱ्यांनी सादर केले आहे. मात्र त्या अधिकाऱ्यांचीच उचलबांगडी केली जाते. याआधी ऑगस्ट २०२० रोजी रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळेस अनिल देशमुखांवर कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं, असंही सिंग यांनी याचिकेत नमूद केलं आहे.