मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत, असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमवीर सिंग यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमवीर सिंग अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले असावेत, असा संशय एनआयए आणि राज्य सरकारला आहे.
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमवीर सिंग यांना एनआयएने अनेक समन्स बजावले आहेत. सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमवीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला होता.
हे प्रकरण उजेडात आले तेव्हा सचिन वाझे थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. एनआयएने नुकतेच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमवीर सिंग यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये परमवीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत.
दरम्यान, चौकशीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांकडूनही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र परमवीर सिंग नक्की आहेत कुठे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून कारवाईची शक्यता लक्षात घेऊन परमवीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी विदेशात पलायन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परमवीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे. सरकारी अधिकारी असल्याने देशाबाहेर जाण्याआधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला भारत सरकारच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांना गृहमंत्रालय शोधत आहे.
– दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री