मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी त्यांचा जमीनपात्र वॉरंटअर्ज रद्द करत सिंह याना दंडदेखील ठोठाण्यात आला आहे. दरम्यान, चांदीवाल आयोगासमोर जाताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे आज एकमेकांसमोर आले. सुमारे तासभर दोघे बोलत होते. या भेटीवरुन चर्चा रंगली असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंबंधी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, “हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सांगण्यात आलं आहे”.
पोलिसांवर दबाव आहे का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “तसा काही प्रश्न उद्भवत नाही. दबाव असण्याचं कारण नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टातून संरक्षण घेतलं असल्याने ज्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत तिथे जबाब देत आहेत”. राज्य सरकार सीबीआयला सहकार्य करत असल्याचे सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले. परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान परमबीर सिंह यांनी पदभार स्विकारला आहे का? असं विचारण्यात आलं असता दिलीप वळसे पाटील यांना नकार देत त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत संपर्क साधला नसल्याची माहिती दिली. तसंच परमबीर सिंह सेवेत नसताना त्यांनी सरकारी वाहनाचा वापर करणं चुकीचं असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान वाझे-सिंह भेटीबद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी केली. एक उपनिरीक्षक व तीन शिपायांचे जबाब नोंदवल्यानंतर त्याची कागदपत्रे नवी मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आली. वाझेंसोबत आलेले पोलीस नवी मुंबई पोलीस दलाला संलग्न असल्यामुळे ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी सांगितले. या प्रकरणाची गृह विभागाकडून माहिती घेण्यात आली.