भारतीय चित्रपटसृष्टीची राजधानी मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये अनेक विषयांवर चित्रपटांची निर्मिती होते पण सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये जे काही सुरू आहे, ते पाहता या चित्रपटसृष्टीतील एखाद्या प्रतिभाशाली लेखकालाही सुचणार नाहीत किंवा एखाद्या दिग्दर्शकालाही चितारता येणार नाहीत अशा घटना सध्या घडताना दिसत आहेत.
देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये दररोज ज्या प्रकारचे गौप्यस्फोट होत आहेत ते पाहता ही सारी एखाद्या चित्रपटाची कथा असावी, असे वाटल्याशिवाय राहात नाही. या प्रकरणावरून बळी पडलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत जे काही खळबळजनक दावे केले आहेत ते पाहता आता या लेटरला एखाद्या बॉम्बचीच उपमा द्यावी लागणार आहे.
अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी या प्रकरणात केलेल्या कृत्यांची जबाबदारी म्हणून परमवीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बाजूला करून त्यांच्याकडे होमगार्डचे प्रमुखपद देण्यात आल्यानंतर त्याच रागातून त्यांनी हे पत्र पाठवले असा अर्थ काढला जाऊ शकतो; पण पोलीस आयुक्त दर्जाचा एखादा अधिकारी जेव्हा मुख्यमंत्र्यांना थेट पत्र पाठवून त्यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याबाबत विशेषत: गृहमंत्र्यांबाबत तक्रार करतो तेव्हा त्या पत्राची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावीच लागणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने परमवीर सिंग यांना या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याने त्यांनी आपल्यावर आरोप केले आहेत, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला असून परमवीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली असली तरी या प्रकरणाच्या मुळाशी सरकारला जावेच लागणार आहे.
परमवीर सिंग यांनी ई-मेलद्वारे पाठवलेले पत्र अधिकृत ई-मेल खात्यावरून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने करून विनाकारणच बालिशपणाचे प्रदर्शन केले आहे. अशा प्रकारचा ईमेल आला आहे हे महत्त्वाचे आणि तो कोणत्या खात्यावरून आला आहे हे या ठिकाणी महत्त्वाचे नाही याचीही कल्पना जर मुख्यमंत्री कार्यालयाला नसेल तर ही चिंतेची गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा कोणताही ई-मेल जर परमवीर सिंग यांनी पाठवला नसता तर अशा प्रकारची बातमी व्हायरल होताच त्यांनी त्याबाबतचा नकार दिला असता. आतापर्यंत आपण ते पत्र पाठवले नसल्याची कोणतीही माहिती परमवीर सिंग यांनी दिली नसल्याने ते पत्र त्यांनीच पाठवले आहे याबाबत कोणतीही शंका घेण्यास कारण नाही. म्हणूनच या पत्रात परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या दोघांनाही घ्यावी लागणार आहे.
मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून दरमहा किमान शंभर कोटींची वसुली करण्याचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिले असल्याची माहिती परमवीर सिंग यांनी या पत्रात उघड केली आहे. राजकारण्यांचे आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध कसे असतात याबाबत सर्वांना सर्व काही माहीत असले तरी जेव्हा पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर अशा प्रकारे खंडणी वसुलीचा आरोप करतो तेव्हा ती बाब निश्चितच गंभीर मानावी लागते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिन वाझे यांचे प्रकरण समोर आल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमवीर सिंग यांना भेटीसाठी पाचारण केले होते तेव्हा त्या भेटीमध्येही परमवीर सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना अनिल देशमुख यांच्या या कार्यपद्धतीची माहिती दिली होती, असा दावाही परमवीर सिंग यांनी या पत्रात केला आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनाही अनिल देशमुख यांच्या या कार्यपद्धतीची कल्पना असल्याचा दावा परमवीर सिंग यांनी केला असल्याने शरद पवार यांच्यासाठीही हा विषय महत्त्वाचा ठरणार आहे.
केवळ राज्यातील तपास यंत्रणा आणि केंद्रातील तपास यंत्रणा यांच्यातील राजकारणाचा भाग म्हणून या विषयाकडे पाहता कामा नये. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या निमित्ताने जो विषय सुरू झाला आहे त्या विषयाचा शेवट निश्चित कशाप्रकारे होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही कल्पना नसली तरी हा विषय शेवटी एका “लॉजिकल एंड’ला न्यावाच लागणार आहे. स्फोटकांच्या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांचा हात होता आणि या प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन या व्यक्तीचा खूनही झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि ज्याअर्थी सचिन वाझे यांची बदली झाली आणि लगेचच त्यांना अटक करण्यात आली त्या अर्थी या प्रकरणात काहीतरी तथ्य असल्याचे दिसून येते. परमवीर सिंग यांनी आपल्या पत्रात जे काही आरोप केले आहेत याची पुष्टी तपास अधिकारी निश्चितच करू शकतात. कारण सचिन वाझे त्यांच्या ताब्यात आहेत. अनिल देशमुख यांनी आपल्याला दरमहा शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते याची कबुली जर सचिन वाझे यांनी दिली तर अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणीत आणि सरकार समोरील अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे हा एकूणच विषय हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या सरकारचे सल्लागार राष्ट्रवादीचे
सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय कौशल्य पणाला लागणार आहे. केवळ उथळ प्रतिक्रिया देऊन किंवा या विषयाला महत्त्व देत नाही अशा प्रकारची देहबोली दाखवून काहीही साध्य होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये तीन पक्ष सत्तेत सहभागी असल्याने एका महत्त्वाच्या पक्षाच्या मंत्र्याच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या सर्वांनाच या विषयाचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जरी एकत्र आले असले तरी त्यांच्यामध्ये फारसे सख्य नाही ही गोष्टही लपून राहात नाही.
राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अशाप्रकारे अडचणीत येत असताना कॉंग्रेस कोणती भूमिका घेते हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. परमवीर सिंग यांच्या या लेटर बॉम्बमुळे निश्चितच धमाका झाला आहे. त्याचा फटका कुणाकुणाला बसतो हे आगामी काळात सिद्ध होईलच; पण केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणातही आतापर्यंत कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने आपल्या खात्याच्या प्रमुखावर म्हणजेच गृहमंत्र्यांवर अशाप्रकारे थेट लाचखोरीचे आरोप केले नव्हते याची नोंद मात्र यानिमित्ताने घ्यावी लागणार आहे.