मुंबई – शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.
पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांसोबत चर्चा केल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार काय? असा प्रश्न चर्चिला जातोय.
अशातच आता शिवसेना नेते अनिल परब यांनी गेल्या २-३ दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींबाबत वक्तव्य केलं आहे. परब यांनी, “महाविकास आघाडीत कुठेही अस्वस्थता नाही, शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच.” असा दावा करत सर्वकाही आलबेल असल्याचं सांगितलंय.
…म्हणून मुख्यमंत्र्यांची सेना आमदारांशी चर्चा
मुख्यमंत्र्यानी सेने आमदारांसोबत केलेल्या चर्चेबाबत बोलताना परब यांनी, “शिवसेनेच्या आमदारांशी नव्हे तर टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत, कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, आश्वासनं कशी पूर्ण करायची, आमदारांशी बोलून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आमचा वचननामा आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रासमोरील प्रश्न जाणून तो सोडवण्याबाबत मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत.” असा दावा केला.
भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी काडीचाही संबंध नसताना शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत परब यांनी, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तो ड्रग्स घ्यायचा हे सगळ्यांच्या समोर आलं आहे. दिल्लीची टीम मुंबईत आली तरी काय साध्य झालं? या प्रकरणात जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले?’ असा प्रश्न उपस्थित केला.