मुंबई – राज्यात शासकीय परिक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. लातूरमध्ये आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परिक्षांची पेपरफुटीही समोर आली. यामुळे आता राज्य सरकारने या परीक्षा घेण्याकरता 3 कंपन्यांची निवड केली आहे. हा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
यापुढे राज्यातील शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), आयबीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल) किंवा टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. या महत्त्वाच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनुमती दर्शविली आहे.
याआधी 2014 मध्ये सुद्धा या संस्थांच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र सरकार बदलल्यांतर हे कंत्राटही बदलण्यात आले होते. पण आता महाविकास आघाडीने आपला निर्णय बदलला आहे. दरम्यान याआधी म्हाडाच्या परीक्षा आता टीसीएसच्या मदतीने घेण्यात येणार असल्याचे समोर आले होते.
म्हाडाचा पेपर फुटल्यानंतर परीक्षेबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पेपरफुटीमुळे रद्द झालेली परिक्षाही लवकरात लवकर घेण्यात येईल आणि त्यात पूर्ण पारदर्शकता राखली जाईल, असेही मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.